उरण : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तुडुंब भरून वाहणारे रानसई धरणातील पाणीसाठा घटला आहे. याचा परिणाम धरणातील भविष्यातील पाणीपुरवठ्यावर होणार असल्याने उरणकरांवर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे.या वर्षी मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे जून महिन्यातच रानसई भरून वाहू लागले आहे. रानसई धरणाची साठवणूक क्षमता घटल्याने उरणच्या नागरिकांना नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या अधिक गंभीर होऊ लागली आहे.

मात्र पावसाळ्यात चार महिने होणाऱ्या पावसामुळे धरणात पाणी पातळी कायम राहण्यास मदत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धरणातील ओसंडून वाहणारे पाणी बंद झाले आहे. एकीकडे धरण भरल्याने जादा वाहणाऱ्या रानसईमधील पाणी कधी अडणार असा प्रश्न आता उभा राहिला आहे. मात्र रानसईच्या उंची वाढीचा प्रस्ताव गेल्या दहा वर्षांपासून पडून आहे. यासाठी लागणारी ७२ हेक्टर जमीन आणि त्यांची परवानगी यामुळे हा प्रस्ताव रखडला आहे.

वाढत्या लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्र यामुळे उरण तालुक्यातील पाण्याचे स्रोत कमी आहेत. यात एमआयडीसीचे मध्यम आकाराचे रानसई धरण आणि जलसंपदा विभागाचे पुनाडे धरण हे दोनच पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. उरणचा मोठ्या प्रमाणात औद्योगिक व नागरी विकास सुरू आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत दररोज ५० ते ६० एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र रानसई धरण आणि पुनाडे धरणाची क्षमता तेवढी नाही. रानसई धरणाची पाणीसाठा साठवण्याची क्षमता १० एमसीएम एवढी आहे तर पुनाडे धरणाची क्षमता जेमतेम १.७५ एमसीएम एवढी आहे.

या दोन धरणांच्या पाणीसाठ्यावर अवलंबून राहिल्यास तालुक्याला फक्त तीन ते चार महिनेच पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सिडकोचे हेटवणे धरण आणि एमजेपीचे बारवी धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तालुक्यात ओएनजीसी, जेएनपीटी, बीपीसीएल यांसारखे मोठमोठे प्रकल्प आणि जेएनपीटीच्या अनुषंगाने निर्माण झालेले मोठमोठे गोदामे यामुळे या परिसरात नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. या विकासामुळे उरण तालुक्यात पाणीटंचाई…

वाढत्या लोकसंख्येमुळे

उरण तालुक्यात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. मागील वर्षीपासून उरण तालुक्यात रेल्वे लोकलदेखील सुरू झाली आहे. न्हावा-शिवडी अटल सेतू यामुळे मुंबई थेट उरण तालुक्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे येथील नागरी वस्तीत वाढ झाली आहे. उरणमधील दोन धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे तो कमी पडत आहे. त्यामुळे स्थानिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भासत आहे. रानसई धरणातून २५ ग्रामपंचायती, ओएनजीसी, एनएडी, वायू विद्युत केंद्र, बीपीसीएल, असे मिळून रोज ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. तर पुनाडे धरणातून पूर्व भागातील १० गावांना पाणीपुरवठा केला जातो.

२५० मिलीमीटर कमी पाऊस :

रानसई धरण क्षेत्रात २०२४ मध्ये १० ऑगस्टपर्यंत १ हजार ७४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर आतापर्यंत केवळ १ हजार ५१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती एमआयडीसी उरणचे अभियंता ग्यानदेव सोनवणे यांनी दिली आहे.