स्मार्ट शहर बनू पाहणाऱ्या खारघरमध्ये वसलेले वैशाली संकुल आपले भविष्यही वर्तमानाएवढेच समृद्ध असावे, म्हणून धडपडणाऱ्यांची वसाहत आहे. आज मिळणारे पाणी, मोकळी हवा, वीज या सुविधा पुढच्या काही वर्षांतही तशाच राहाव्यात म्हणून येथील रहिवासी प्रयत्न करत आहेत. नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापर करण्याचा आणि त्यांचे संवर्धन करण्याचा हा वसा आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवण्यासाठीही या संकुलात विविध उपक्रम राबवले जात आहेत.
वैशाली सोसायटी, खारघर
खारघरमधील सेक्टर ११ मध्ये १९९८ साली वैशाली सोसायटी स्थापन झाली. शहराच्या मध्यभागी हे संकुल आहे. संपूर्ण पनवेल परिसराप्रमाणे खारघरमध्येही पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. या प्रश्नावर मात करण्यासाठी संकुलातील रहिवाशांनी दोन वर्षांपूर्वी संकुलाच्या आवारात कूपनलिका काढली व त्या पाण्याचा वापर झाडांसाठी आणि अन्य कामांसाठी करण्यास सुरुवात केली, मात्र कूपनलिकेतून उपसल्या जाणाऱ्या पाण्यामुळे भूजल पातळी घटली. त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी पावसाचे पाणी साठवण्याचा निर्णय घेतला. इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवून ते ज्या ठिकाणी कूपनलिका आहे, तिथे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हे पाणी जमिनीत मुरेल आणि त्यामुळे भूजलपातळी कायम राहून रहिवाशांना अखंडित पाणीपुरवठय़ाची सोय करता येईल, ही त्यामागची कल्पना होती. ही कल्पना अमलात आणण्यात आली आणि त्यामुळे भूजलपातळी कायम राखण्यास हातभार लागला. खारघरमधील पाणीटंचाईच्या झळांपासून हे संकुल त्यामुळेच दूर राहिले आहे. कूपनलिकेतून मिळवलेले पाणी आवारातील झाडांसाठी वापरले जाते. दोन-तीन दिवस पाणीपुरवठा न झाल्यास घरगुती वापर केला जातो. संकुलाच्या जलतरण तलावातही हेच पाणी वापरले जाते. वेळेप्रसंगी परिसरातील इतर संकुलांनाही वैशाली सोसायटी पाणी पुरवते.
अद्ययावत उद्वाहक, अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही, महानगर गॅस जोडणी अशा सर्व आधुनिक सोयीसुविधांनी हे संकुल परिपूर्ण आहे. रहिवाशांच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारचे चोख नियोजन करण्यात आले आहे. दृश्य स्पष्टपणे टिपणारे उत्तम दर्जाचे २० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा कॅमेऱ्यामध्ये कैद झालाच पाहिजे, असे कोन साधून हे कॅमेरे लावले आहेत. सुरक्षारक्षकांनी रात्री काटेकोर काम करावे यासाठी ‘वॉचमन वॉच डॉग’ ही सेन्सर असलेली प्रणाली बसविण्यात आली आहे. रात्री दर एका तासाने फोनची रिंग वाजणार आणि तो फोन उचलला जात नाही तोपर्यंत ती रिंग वाजतच राहणार, अशी सोय या यंत्रणेत आहे. त्यामुळे कोणताही सुरक्षा रक्षक रात्री कामचुकारपणा करू शकत नाही.
सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर सेन्सर बसविण्यात आला आहे. तो रात्री सुरू ठवण्यात येतो. रात्री कोणीही जिन्याचा वापर करू नये, असे रहिवाशांना सांगण्यात आले आहे. या काळात जर अनोळखी व्यक्तीने संकुलात प्रवेश केला तर तो सेन्सर वाजतो. रात्री फक्त एकच लिफ्ट सुरू ठेवण्यात येते. प्रत्येक कुटुंबालाही स्वतंत्र सुरक्षा देण्यात आली आहे. प्रत्येक घराच्या दरवाजावर एक सेन्सॉर लावण्यात आला आहे. जेव्हा घराचा दरवाजा उघडतो किंवा बंद केला जातो, तेव्हा लावताना हा सेन्सर वाजतो, संकुलातील प्रत्येक नागरिकाला याचा कोड देण्यात आला आहे, तो कोड टाकला की सेन्सर बंद होतो. कोणतीही अनोळखी व्यक्ती घरात घुसल्यास पकडण्यासाठी ही व्यवस्था आहे.
संकुलात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. महिला आणि मुले आयोजनात पुढाकार घेतात. उत्सवांदरम्यान अनेक स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये नृत्य, गायन, रांगोळी, वेशभूषा इत्यादी स्पर्धाचा समावेश असतो. रुग्णांची ने-आण करण्यासाठी चाकांच्या खुर्चीचीही सोय करण्यात आली आहे.
माझ्या नावे एक झाड
संकुलातील मुलांनी शैक्षणिक यश प्राप्त केल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार केला जातो. सत्कारावेळी त्यांना एक रोपटे दिले जाते. त्या मुलाने ते संकुलात लावावे आणि वाढवावे, अशी अपेक्षा असते. मुले झाडावर स्वत:च्या नावाची पाटी लावतात व रोज त्याची काळजी घेतात. आशा प्रकारे संकुलात तब्बल हजार झाडे लावलेली आहेत.
सौर ऊर्जा आणि खतनिर्मिती
भविष्यात सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सदस्यांनी सांगितले आहे. इमारतीच्या छतावर शेड टाकण्यात आले आहे. त्यावर सौर पॅनल बसवून त्यातून निर्माण होणारी वीज संकुलातील सोयींसाठी वापरण्याचा आणि उर्वरित वीज महावितरणाला देण्याचा विचार असल्याचे तेथील पदाधिकारी सांगतात. आवारात सर्वत्र एलईडी दिवे लावून वीज बचत केली आहे. कचऱ्याचे वर्गीकरण या संकुलाकडून आधीच करण्यात येत होते. आता त्यावर प्रक्रिया करून जैविक खतनिर्मिती केली जाणार आहे.