पनवेल : राज्य सरकारकडील आर्थिक टंचाईमुळे विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्ग रखडल्याने केंद्र सरकारचे जेएनपीटी ते दिल्ली आठ तासांत जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी महामार्गाचे स्वप्न अर्धवट राहण्याच्या मार्गावर आहे. या दरम्यान बडोदा-मुंबई महामार्गातील ‘मिसिंग लिंक’ तयार करण्यासाठी नवा पर्याय शोधण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू झाले आहे. आयसीटी कंपनीला याबाबतचा तपशीलवार प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सोपवले असून ऑगस्ट अखेरपर्यंत ही कंपनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर त्याबाबतचा अहवाल मांडणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेतून मुंबई–दिल्ली महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या मार्गाच्या माध्यमातून जेएनपीटी बंदरातून थेट दिल्लीपर्यंत अवघ्या आठ तासांत पोहचणे शक्य होणार होते. या महामार्गाचा एक भाग असलेल्या बडोदा-मुंबई महामार्गाचे काम पनवेल तालुक्यातील मोरबे गावापर्यंत अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील वर्षापासून हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याच्या तयारीत असला तरी या महामार्गाला जेएनपीटी बंदराशी जोडण्यासाठी आवश्यक असणारा विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्ग रखडल्यामुळे संपूर्ण मार्गाच्या सुसंगततेला ब्रेक लागला आहे.

महाराष्ट्र सरकारकडे भूसंपादन व बांधकामासाठी निधीची कमतरता असल्याने हा प्रकल्प रखडला आहे. पुढील काही महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार असल्याने शहरातील शीव पनवेल, कळंबोली – मुंब्रा-पनवेल, कल्याण-तळोजा या महामार्गांवरील वाहतूक कोंडी दूर करण्याची संधीही हातची गेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रखडलेल्या अवस्थेमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिल महिन्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मोरबे ते कळंबोली पर्यंत ‘मिसिंग लिंक’चा नव्याने प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. सध्या आयसीटी कंपनीकडून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत याबाबतचा अहवाल मिळण्याची शक्यता असून, मार्गाचे अंतर व खर्च कमी ठेवण्याच्या सूचनाही गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

नवा मिसिंग लिंक या मार्गे?

हा महामार्ग मोरबे, महाळुंगी, कानपोली, पाले बुद्रुक, वळवली, टेंभोडे मार्गे कळंबोली सर्कल येथील आठपदरी महामार्गाला जोडण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जाते. वाहतूकीला जलद व सुलभ मार्ग देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प पनवेलच्या भविष्यातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.