जॉब चारनॉक हा ब्रिटिश तरुण १६५८७ साली ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगालमधील कासिमबझार येथील वखारीत नोकरीवर रुजू झाला. सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीचे स्थानिक मुख्यालय हुगळी येथे होते. या काळातला मोगलांचा बंगालमधील सुभेदार शाएस्तेखान याच्या मनमानी कारभाराने कंपनीचे अधिकारी त्रस्त झाले होते. स्थानिक मोगल अधिकाऱ्यांशी त्यांच्या वारंवार चकमकी उडत असत. कासिमबझार आणि हुगळीच्या व्यापारावर देखरेख करण्याचे काम चारनॉक यांच्यावर सोपवले गेले होते. पुढे त्यांना पाटण्यात राहून साल्टपीटर म्हणजे सोरा याच्या व्यापाराचा प्रमुख नियंत्रक म्हणून जबाबदारी देण्यात आली. या कामासाठी ते सोळा वर्षे पाटण्यात राहिले.

पाटण्याच्या मुक्कामात असताना एक हिंदू सुस्वरूप स्त्री पतिनिधनानंतर सती जात होती. चारनॉक यांनी आपले शिपाई पाठवून तिला पळवून आणले आणि तिच्याशी रीतसर हिंदू रिवाजाप्रमाणे लग्न लावले. हिंदू वसतीमध्ये हिंदू रिवाज पाळून हे चारनॉक कुटुंब राहिले. त्यांना दोन मुलेही झाली. चारनॉकने पत्नीचे नाव मेरी असे बदलले, परंतु तिने ख्रिश्चन होण्यास नकार दिला. चारनॉकने पुढे ख्रिश्चन धर्माचा त्याग केला अशी वदंता होती.

१६८५ साली चारनॉक हुगळीच्या महत्त्वाच्या वखारीचे प्रमुख झाले. त्या वेळी शाएस्तेखानाने हुगळीवर फौज पाठवून इंग्रजांना वेढा घालून त्यांची रसद तोडली. आपला निभाव लागत नाही असे पाहून चारनॉक आपल्या ४०० लोकांसह होडय़ांमधून खाली २७ मल आले. ही दलदलीची जागा सुरक्षित आणि लढण्यास योग्य वाटल्याने त्या ठिकाणी कंपनीची बंगालमधील प्रमुख वखार स्थापन करण्याचे चारनॉक यांनी ठरवले. या परिसरात सुतनुती, गोविंदपूर आणि कालीघाट ऊर्फ कालीकाता ही तीन खेडी होती. या ठिकाणी चारनॉक यांनी प्रथम वसती आणि वखारीचे कार्यालय सुरू केले. कालीघाट (कालीकाता) येथे पुढे शहर वसले. ते आजचे कोलकाता ऊर्फ कलकत्ता! चारनॉकचे लोक या पाणथळ जागेत राहावयास आले तेव्हा डास व इतर रोगराईमुळे आजारी पडून निम्म्याहून अधिकजण मृत्युमुखी पडले. जॉब चारनॉक स्वत: तीन वर्षांत आजारी पडून १६९३ साली नवजात कलकत्त्यात निधन पावले.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com