समुद्र किनाऱ्याजवळ व कमी खोलीच्या ठिकाणी माशांना प्रजनन करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने कृत्रिम भित्तिका (म्युरल) (artificial reese) समुद्रात सोडण्याची योजना आखली असून या योजनेमध्ये सिमेंटच्या भित्तिका सोडणारी बोट सातपाटी समोरील खडकावर अडकली.

माशांना प्रजननासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे म्हणून खाडी मुखाच्या जवळपास कृत्रिम परिस्थिती निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना देशभरात राबवित असून त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करीत आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या जिल्ह्याच्या यापूर्वी अभ्यासलेल्या ठिकाणी कृत्रिम भित्तिका समुद्रतळावर सोडण्याची योजना आहे.

हेही वाचा >>>पालघर : राष्ट्रीय महामार्गावर अपघात, वाहतूक विस्कळीत; संत्रा वाहतूक करणारी गाडी उलटली

ठाणे जिल्ह्याच्या उत्तन व पालघर जिल्ह्याच्या वसई, अर्नाळा भागात कृत्रिम भित्तिका समुद्र तळावर सोडण्याचे काम केल्यानंतर ही बोट सातपाटी जवळ आली असता नौकानयन करणाऱ्या तांडेलला खडकाचा अंदाज नसल्याने ही बोट खडकात अडकली आहे. सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले उधाणाचे पाणी आल्यानंतर समुद्रात बोट पुन्हा सोडण्यात येईल असे सांगण्यात आले.

यासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाचे सहसंचालक दिनेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आठ ते दहा मीटर खोली असणाऱ्या समुद्र तळावर कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडण्याची योजना असून या योजनेमध्ये अंतर्गत काम करणाऱ्या बोटचालकाला सातपाटी जवळील भौगोलिक परिस्थितीची माहिती नसल्याने खडकात अडकल्याचे सांगितले. कृत्रिम भित्तिका समुद्र तळावर सोडण्याचे काम शासकीय योजनेअंतर्गत असून यामध्ये कोणताही घातपात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातपाटी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली.