पालघर : दहिसर (मुंबई) लगत १.२० किलोमीटरच्या एका मार्गिकेच्या पट्ट्याचे काँक्रिटीकरण अखेरच्या टप्प्यात असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या राज्यातील काँक्रिटीकरणाचे जवळपास ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील प्रमुख चार उड्डाणपूलांचे काम मे अखेर च्या आठवड्यात पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दहिसरच्या अलीकडे वर्सोवा ते हॉटेल दिल्ली दरबार दरम्यानच्या एका मार्गीकेचे काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले असून हे काम १७- १८ मे महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे. त्यानंतर १० दिवस काँक्रीट मजबुतीकरण (क्युरिंग) झाल्यानंतर त्यावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर वर्सोवा पूल ते दहिसर टोल नाका दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागणार आहे.
काँक्रीटच्या पट्ट्या (पॅनल) मधील काँक्रिटीकरण काही ठिकाणी योग्य पद्धतीने झाले नसल्याने पुष्ट भाग खडबडीत अथवा अयोग्य असल्याने त्या ठिकाणी इपॉक्सी थर देण्याचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत इपॉक्सी थर अंथरण्याचे काम ४० टक्के पूर्ण झाले असून हे काम मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
तलासरी सह पालघर तालुक्यातील विक्रमगड फाटा व नांदगाव फाटा येथील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून हे तीनही उड्डाणपूल २० मे पर्यंत कार्यरत होणे अपेक्षित होते. मात्र अवकाळी पावसामुळे काम रेंगाळली असून हे दोन्ही पूल २५ मे पर्यंत कार्यरत होतील अशी अपेक्षा आहे. पालघर तालुक्यातील सातीवली येथील उड्डाणपुलाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. याखेरीस वसई तालुक्यात पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू असून त्यापैकी अनेक नवीन पूल कार्यरत झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी लोकसत्ता ला दिले.
प्रकाश योजना पावसाळ्यापूर्वी होणार कार्यान्वित
राष्ट्रीय महामार्गावर ४०० प्रकाश दिवे उभारण्यात येणार असून उड्डाणपूल तसेच नागरी रस्त्यांमध्ये प्रामुख्याने प्रकाश योजनेचा समावेश करण्यात आला आहे. प्रकाश दिव्यांच्या खांबांची उभारणी करण्यासाठी फाउंडेशन ब्लॉक उभारण्या चे काम सध्या सुरू असून पावसाळ्यापूर्वी नियोजित केलेली प्रकाशयोजना कार्यरत होईल असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तर्फे व्यक्त करण्यात आला.
क्रॉसिंगच्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र
उड्डाणपुला च्या मध्य भागाचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले असले तरी त्या खालून वाहन जाण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. यापूर्वी महामार्गाच्या मार्गीका क्रॉसिंगच्या ठिकाणी तसेच पुलाच्या उभारणी दरम्यान हंगामी पद्धतीने तयार केलेल्या क्रॉसिंगच्या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. उड्डाणपूल कार्यरत होत असल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त होत आहे
१८ महिन्यानंतर होणार सुखकर प्रवास
डिसेंबर २०२३ मध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यानंतर काम सुरू असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी तुफान वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. गेल्या दोन महिन्यांपासून वर्सोवे ते चिल्हार फाटा दरम्यानचे काम पूर्ण झाल्याने ठाणे- मुंबई पर्यंतचा प्रवास गेल्या दीड वर्षाच्या तुलनेत सुखकर झाला असून पालघर येथून दीड – दोन तासात ठाणे गाठणे सहज शक्य झाले आहे.