डहाणू स्थानकाबाहेर सकाळ, संध्याकाळ वाहनांची गर्दी डहाणू: शहरातील मुख्य रस्त्यांवर अवैध आणि बेशीस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. डहाणू रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच या वाहनांच्या गर्दीमुळे प्रवाशांना वाट काढणे कठीण होत आहे. डहाणू शहरातील अवैध पार्किंग आणि बेशिस्त वाहनांमुळे वयोवृद्ध नागरिक,महीला,लहान मुले यांना रस्ता ओलांडण्यासाठी जोखीम पत्करावी लागत आहे. पोलीसांनी या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. डहाणू तालुक्यातील मुख्य रस्ते, फेरीवाले, हातगाडीवाले, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, आणि रिक्षावाल्यांनी मुख्य रस्ते अडवले आहेत. लोकांना वाहन चालविताना रस्ता ओलांडणे म्हणजे मोठी समस्या निर्माण झाली आहे. डहाणू शहरात मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बसलेले फेरीवाले, हातगाडीवाले, रिक्षावाले, आणि बेकायदेशीरपणे रस्त्यावर उलट सुलट पार्किंग करून वाहतूक कोंडी करत आहेत. याबाबत डहाणू नगर परिषदेकडे नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. डहाणू पोलिसांनी अवैध पार्किंगविरुद्ध मोहीम सुरू केली होती मात्र पुन्हा या समस्येने डोके वर काढले आहे त्यामुळे रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. डहाणू नगर परिषद हद्दीतील इराणीरोड, थर्मल पॉवर रोड, आणि डहाणू रोड रेल्वे स्थानक ते सागर नाका रोड, यावर दररोज मोठय़ा प्रमाणावर वाहन चालका बरोबरच, बेकायदा अवैधरित्या वाहने पार्किंग करून ठेवलेली असतात. शिवाय फेरीवाले, हातगाडीवाले, भाजीविक्रेते ही रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतात त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे. या समस्येमुळे लहान-मोठे अपघातही घडत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. त्यात भर म्हणून पहाटे डहाणू बाजारपेठेत नाशिक येथून भाजीपाला घेऊन येणारी मोठी मोठी वाहने रस्त्यावर उभी रहात असल्याने, मुंबई आणि गुजरात भागात नोकरी-व्यवसायानिमित्त डहाणूरोड रेल्वे स्थानकात जाणे जिकिरीचे झाले आहे. या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले, हातगाडीवाले, भाजी विक्रेते, आणि रिक्षावाले, यांच्यामुळे नागरिकांना दिवसभर त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, पोलिसांच्या पथकाने बेकायदेशीरपणे रस्त्यावर उभी केलेली वाहने आणि फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम राबविल्यामुळे काहीकाळ शहराने मोकळा श्वास घेतला. मात्र पुन्हा तीच वेळ ओढवली आहे.