पालघर : मान्सूनपूर्व सरी मोठ्या प्रमाणात झाल्या असल्या तरी हवेतील आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत आहे. अशा वेळी माकुणसार येथील वीज उपकेंद्राला जोडणाऱ्या विद्युत केबल (वाहिनी) मध्ये वारंवार बिघाड होत असल्याने केळवे व सफाळे भागातील नागरिकांना मोठ्या अवधीसाठी वीज पुरवठा विना राहावे लागत आहे. यामुळे पर्यटन व्यवसायिकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मे महिन्याच्या अखेरीस झालेला पाऊस जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही ठिकाणी सुरू राहिला होता. यावेळी चार वेळा मोठ्या अवधीसाठी विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. महावितरण कंपनीकडून उपकेंद्राला जोडणाऱ्या केबल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अनुक्रमे ३६, ३३, १८ व आठ तासांच्या अवधीसाठी वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार गेल्या पंधरवड्यात घडले आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भात माहिती देण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात कोणताही जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्याने तसेच महावितरण कंपनीकडून एसएमएस किंवा इतर माध्यमातून वीज प्रवाह खंडित होण्यामागील कारणाची माहिती दिली गेली नसल्याने नागरिकांना अनिश्चिततेच्या वातावरणात व अंधारात रात्र जागवून काढावी लागत आहे.
हवेमधील आर्द्रता वाढल्याने तसेच पावसाच्या सरी झाल्याने किडे, पाखर व डासांची संख्या वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोळीला सामोरे जावे लागत आहे. माकुणसार वीज उपकेंद्रातून प्रवाह खंडित झाल्याने केळवे, सफाळे, एडवण, आगरवाडी, रामबाग व परिसरातील अनेक गावांना पुरवठा होत नसल्याने काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या देखील निर्माण झाली होती.
यासंदर्भात महावितरण कंपनी च्या पालघर चे कार्यकारी अभियंता सुनील भारंबे यांच्याशी संपर्क साधला असता ३३ केवी क्षमतेच्या सुमारे १५० मीटर विद्युत वाहिनी (केबल) मध्ये दोन वेळा बिघाड झाल्याने मोठ्या कालावधीसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. या केबल ऐवजी खांबावरून केबल अथवा वाहिनी टाकण्याचे काम नवीन आराखड्यात मंजूर करण्यात आले असून हे काम येत्या पंधरावाड्यात पूर्ण करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.
पर्यटन व्यावसायिक त्रस्त
उन्हाळ्याच्या काळात अधिक तर पर्यटन हे वातानुकूलित खोल्याची मागणी करत असून विद्युत प्रवाह खंडित झाल्यास जनरेटरवर वातानुकूलित यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत होत नाही. त्यामुळे अनेकदा पर्यटकांना गैरसोळीला जावे लागत असून त्यामुळे पर्यटन व्यवसायाला आगामी काळात फटका बसू शकेल अशी भीती केळवे येथील पर्यटन उद्योगातील व्यवसायिकांकडून सांगण्यात आले.