वाडा शहरातील नागरिकीकरण झपाट्याने वाढले आहे. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर नोकरी, व्यवसाय, कामधंदा, मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने अथवा सोयी सुविधा मिळाव्या या उद्देशाने शहराकडे स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे शहरातील समस्या देखील तितक्याच वाढत गेल्या आहेत. वाडा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतरित होऊन आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे, मात्र वाडा शहरातील अनेक समस्या,”जैसे थे राहिल्या आहेत.
२०१७ साली स्थापन झालेली वाडा नगरपंचायतीमध्ये १७ प्रभाग आहेत. वाडा शहरातील लोकसंख्या अंदाजे २५ हजारांच्या जवळपास पोहचली आहे. वाडा शहरात पाणी, रस्ते, गटार, कचरा समस्या, इतर अपूर्ण कामे, श्र्वानांचा उपद्रव, रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे, वाहतूक कोंडी, अवैद्य पार्किंग, ज्येष्ठ नागरीक व मुलांसाठी बसण्यासाठी किंवा फिरण्यासाठी उद्यान, खेळण्यासाठी क्रीडांगण नसणे, मच्छी व फळ, भाजीपाला बाजारपेठ करिता पुरेशी जागेची व्यवस्था नसणे अशा समस्यांच्या गर्तेत आजही वाडा नगरपंचायत अडकली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोकळा श्वास कधी मिळणार असा सवाल नागरिक विचारत आहेत.
नगरपंचायत झाल्यापासून २०१७ ते २०२५ पर्यंत नऊ प्रभारी मुख्याधिकारी तर चार वेळा पुर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले आहेत. मागील दोन वर्षांपासून मनोज पष्टे हे मुख्याधिकारी तथा प्रशासक आहेत. मात्र वाडा शहरात सुधारणा व विकास होण्याच्या दृष्टीने अपेक्षित नियोजन होऊ शकले नाही.
वाडा शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यां बाबतीत अनेकदा तक्रारी करून देखील त्यावर कुठलीही कार्यवाही केली जात नाही. तसेच लेखी पत्राद्वारे उत्तर मागितले असता कुठलेही नगरपंचायत प्रशासना कडून उत्तर दिले जात नाही किंवा उत्तर देण्यासाठी जाणूबुजन दिरंगाई केली जात असल्याने नगरपंचायतीचा कारभार कसा सुरू आहे हे दिसून येत आहे. याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
वाडा शहरातील अंतर्गत रस्त्यांचे मागील दोन वर्षांपूर्वी काँक्रिटकरण सुरू झाले आहे. मात्र अनेक भागात रस्ते बनलेलेच नाहीत. ज्या ठिकाणचे कॉंक्रिटीचे रस्ते बनले आहेत ते अपूर्ण तर काही नित्कृष्ट दर्जाचे बनविले असल्याची नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
गटारीची व्यवस्था
कॉंक्रिटीकरण रस्ते बनविताना वा झाल्यानंतर ठेकेदाराकडून गटारीची कामे पुर्ण झाली नसून गटार उभारणीचे अंदाजपत्रकात तरतूद केली नसल्याचे नागरीकांना सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या गटार अपूर्णावस्थेत व उघड्यावर आहेत. सांडपाणी जाण्यासाठी गटार व्यवस्था नसल्याने त्या तुंबल्या जात आहेत. पावसाळ्यात या गटारीतील सांडपाण्याच्या दुर्गंधीचा सामना नागरीकांना करावा लागतो. काही ठिकाणी रस्त्यावर सांडपाणी येत असल्याने नागरिक त्रस्त होत आहेत.
कचऱ्याची समस्या
वाडा नगरपंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांच्या घरोघरी व इमारतीत डिजिटल प्रणालीचा अवलंब करून “क्यूआर कोड” बसविण्यात आला आहे. मात्र ही डिजिटल प्रणाली केवळ दिखाव्यापुरता कार्यरत असल्याचे दिसत आहे. वाडा नगरपंचायतीच्या घनव्यवस्थापनाचा ठेका फेब्रुवारीत संपला आहे. नवीन निविदा प्रक्रिया रखडली आहे. नगरपंचायतीकडून सुका व ओला कचरा दरदिवशी सात टन उचलला जातो असा दावा मुख्याधिकारी यांनी केला आहे. यासाठी १० घंटा गाड्या (ट्रॅक्टर धरून) कार्यरत असुन ४० सफाई कामगार आहेत. मात्र कचरा गोळा करण्यासाठी सफाई कर्मचारी अनेक ठिकाणच्या इमारतीत किंवा परिसरात मागील एक ते दीड वर्षांपासून पोहचलेले नाहीत.
रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी कचरा कुंडीची व्यवस्था केलेली नसल्याने नागरिक रात्रीच्या वेळी कचरा रस्त्यावर टाकत असून तो सकाळी नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी गोळा करताना दिसून येते. यामुळे नगरपरिषदेतर्फे केले जाणारे दाव फोल ठरत आहेत.
अपूर्ण कामे
स्टेट बँक ते वाडा पंचायत समिती रोडवरील कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतरही खोदलेला रस्त्याला ठेकेदाराने गटार न करताच तसाच ठेवला आहे. या रस्त्यावरून चालताना नागरिक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून चालावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी येथे माती भराव केला होता तो पुन्हा काढण्यात आला आहे. मात्र अद्यापही गटारीचे काम सुरू हाती घेतले नाहीत. या गटारीसाठी खोदलेल्या ठिकाणी इमारतींना पाणी पुरवठा करणाऱ्या छोट्या जलवाहिन्या गेल्या आहेत. त्याची काळजी घेऊन गटार बनविणे गरजेचे आहे. अन्यथा त्या तुटल्या तर पाणी पुरवठा खंडीत होईल. पावसाळ्यापूर्वी गटारीचे काम पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होणार नाही. पर्यायाने मातीचा चिखल होईल व हा चिखल स्टेट बँकेच्या खाली उतारावरून रहिवाशांच्या इमारतीत गेल्यास त्यांना या समस्येचा सामना करावा लागणार आहे.
पाणी समस्या
वाडा शहराला सद्यस्थितीत पाणी पुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वरी बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे नगरपंचायतीकडून पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. अनेक ठिकाणी पाणी समस्या कायम राहिली आहे. याकरिता नगरपंचायतीकडून नवीन पाणी योजना मंजूर झाली असली तरीही प्रत्यक्षात तिचे काम सुरू झालेले नाही.