Maharashtra Amravati Division SSC 10th Result 2025 पालघर: माध्यमिक परीक्षा दहावीचा निकाल जाहीर झाला असून परीक्षेला बसलेल्या ६३ हजार ६१७ विद्यार्थ्यांपैकी ६० हजार ६८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पालघर जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.३८ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एका टक्क्याचे घट पडली आहे. तर मुलांच्या तुलनेत मुली दोन टक्क्यांनी पुढे आहेत.
राज्य मंडळाने आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर केला. पालघर जिल्ह्यातून ६४००५ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेकरिता अर्ज भरले होते. त्यातील ३३ हजार ३५५ मुलं तर ३० हजार २६२ मुली असे एकूण ६३ हजार ६१७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ३१ हजार ४४८ मुलं व २९ हजार २३२ मुली असे ६० हजार ६८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या अनुषंगाने मुलांचा ९४.२८ टक्के तर मुलींचा ९६.५९ असा एकूण ९५.३८ टक्के जिल्ह्याचा निकाल लागला आहे.
पालघर जिल्ह्यातील एकूण तालुक्यांच्या तुलनेत वसई तालुक्याचा सर्वाधिक ९६.४८ टक्के निकाल लागला आहे. तर पालघर तालुक्याचा ९५.१५ टक्के, तलासरी तालुक्याचा ९४.४४ टक्के, विक्रमगड तालुका ९४.२६ टक्के, मोखाडा तालुक्याचा ९३.३७ टक्के, डहाणू तालुक्याचा ९३.३६ टक्के, वाडा तालुका ९२.४० टक्के तर सर्वात कमी जव्हार तालुक्याचा ९०.२४ टक्के निकाल लागला आहे.
जव्हार तालुका सर्वाधिक कमी
पालघर जिल्ह्यातील एकूण तालुक्यांच्या तुलनेत वसई तालुक्याचा सर्वाधिक ९६.४८ टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी जव्हार तालुक्याचा ९०.२४ टक्के निकाल लागला आहे. गेल्या वर्षी वसई, पालघर व पाठोपाठ जव्हार तालुका अव्वल होता. मात्र यंदा जव्हार तालुक्यातून २०२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून १८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे इतर तालुक्यांच्या तुलनेत जव्हार तालुक्यातून सर्वाधिक कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
चार वर्षापासून टक्क्याची चढ-उतार सुरूच
यंदा दहावीचा निकाल ९५.३८ टक्के लागला असून मागील वर्षी ९६.०७ टक्क निकाल लागला होता. मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास एका टक्क्याचा फरक पडला आहे. तर २०२३ मध्ये ९३.५५ टक्के निकाल लागला होता. त्यामुळे २०२३ च्या तुलनेत यंदा समाधानकारक निकाल लागला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. तर गेल्या तीन वर्षात सर्वाधिक निकाल २०२२ मध्ये ९७.१७ टक्के लागला होता. त्यामुळे एक ते दोन टक्क्यांची चढ-उतारी गेल्या चार वर्षापासून सुरू आहे
मुली पुन्हा एकदा सरस
गेल्या तीन वर्षाची मुलींची टक्केवारी पाहता २०२२ मध्ये २.३१ टक्क्यांनी व २०२३ मध्ये २.९६ टक्क्यांनी व २०२४ मध्ये मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १.६७ टक्क्यांनी अधिक होते. तसेच यंदा २.३१ टक्क्यांनी शालांत परीक्षांमध्ये मुली सरस असल्याचे पाहायला मिळाले आहे.