डहाणू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका चालकाचे अपहरण करून त्याच्याकडील ७० लाख २० हजार रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळावर २२ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री १.२० ते १.३० वाजण्याच्या सुमारास घोळ गावाजवळ, सूर्या नदीच्या पुलाजवळ घडली. या प्रकरणी मनीषकुमार गोठवाल यांनी कासा पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
मनीषकुमार गोठवाल (वय ४७, रा. मेहसाना, गुजरात) हे अहमदाबाद येथील एका व्यावसायिकाकडे वाहन चालकाचे काम करतात. सोमवार २१ जुलै रोजी त्यांना अहमदाबादहून मुंबईला ७० लाख रुपये रोख रक्कम मालकाच्या कार मध्ये घेऊन येण्यास सांगितले. मनीषकुमार यांनी त्यांचा मित्र अक्षय कनुभाई पटेल याला सोबत घेतले.
अहमदाबादहून निघालेल्यानंतर, २२ जुलै रोजी पहाटे कासा पोलीस ठाणे हद्दीतील घोळ गावाजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अचानक दोन अज्ञात गाड्यांनी त्यांच्या कारचा रस्ता अडवला. इनोव्हा आणि आणखी एका कारमधून अंदाजे २५ ते ४० वयोगटातील चार अज्ञात हल्लेखोर खाली उतरले. त्यांनी कारच्या दोन्ही बाजूच्या काचा फोडल्या आणि मनीषकुमार व अक्षय पटेल यांना जबरदस्तीने बाहेर ओढले. त्यांना मारहाण करून डोळ्यांना पट्टी बांधली आणि हात बांधून इनोव्हा कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अपहरणकर्त्यांनी मनीषकुमार आणि अक्षय यांना धमकावले. सुमारे एक तास त्यांना इनोव्हा कारमध्ये फिरवल्यानंतर सावरखंड येथील मनोर-विक्रमगड रोडजवळ सोडून दिले. त्यानंतर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मनीषकुमार आणि अक्षय यांनी चालत जाऊन मनोर जवळचे सिमला इन हॉटेल गाठले आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तक्रारदाराची कार सोमटा गावाजवळ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकाजवळ अपघातग्रस्त अवस्थेत आढळली.
कारची पाहणी केली असता, त्यात ठेवलेली ७० लाख रुपयांची रोकड आणि चालकांचे २०,००० रुपयांचे दोन मोबाईल चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी कासा पोलिसांनी अज्ञात चार हल्लेखोरांविरुद्ध ७० लाख २० हजार रुपयांची जबरी चोरी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पालघर पोलिस करत आहेत.