डहाणू : महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर वसलेल्या पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कोचाई-बोरमाळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पारसपाडा येथे स्मशानभूमीच्या अभावी एका ११० वर्षीय आदिवासी महिलेच्या पार्थिवावर भरपावसात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. या घटनेने जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग आजही मूलभूत सुविधांपासून कसे वंचित असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

बोरमाळ येथील रहिवासी मोटलीबेन अहिर यांचे वयाच्या ११० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी लांब असल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांना मुसळधार पावसात चिखलात उभे राहून आजींवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. ग्रामस्थांनी या प्रशासकीय अनास्थेवर तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.

२०१४ साली पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. विकासाची आणि प्रगतीची स्वप्ने दाखवली गेली. मात्र, दहा वर्षांनंतरही हा जिल्हा अनेक आदिवासीबहुल समस्यांनी ग्रासलेला आहे, हे या घटनेतून सिद्ध झाले आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांची वानवा तर आहेच, पण मृत्यूनंतर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठीही जागा नाही, ही चिंतेची बाब आहे.

यापूर्वीही बोरमाळ आणि आसपासच्या परिसरात स्मशानभूमीअभावी पावसात अंत्यसंस्कार करावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वारंवार स्मशानभूमी साठी मागणी करूनही प्रशासनकडून याकडे डोळेझाक केली जात असल्याचे आरोप होत आहेत. आता तरी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पावले उचलावीत अशी मागणी पुढे येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बोरमाळ गावामध्ये आदिवासी, धोडी, अहिर आणि इतर समाजाचे नागरिक वास्तव्य करतात. गावातील चार पाड्यांसाठी एक स्मशानभूमी आहे. मात्र प्रत्येक समाजातील चालीरीती वेगवेगळ्या असून स्मशानभूमी जवळ आवश्यक सुविधांचा अभाव असल्यामुळे नदी किनारी अंत्यसंस्कार केले जातात. याठिकाणी नवीन स्मशानभूमी उभारण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र काही कारणास्तव स्मशानभूमी उभारणीचा प्रस्ताव प्रलंबित राहिल्याचे संगितले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोरमाळ गावासाठी एक किलोमीटर परिघात स्मशानभूमी असूनही काही नागरीक मृत व्यक्तींचे अंतिम संस्कार नदीकिनारी करतात. अंतिम संस्कारासाठी व्यवस्था असताना उघड्यावर अंतिम संस्कार करणे योग्य नाही. संबंधित व्यक्तींनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी बोरमाळ मधील या स्मशानभूमीत अंतिम संस्कार करणे आवश्यक होते मात्र तसे न करता त्यांनी उघड्यावर अंतिम संस्कार केल्याने या मागचे कारण काय हे त्यांच्याशी चर्चा करून समजून घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करू – आशा वळवी, सरपंच, कोचाई बोरमाळ ग्रुप ग्रामपंचायत