कासा: डहाणू तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना आणि जन मन योजनेच्या माध्यमातून १५,९३३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे गोरगरीब व आदिवासी लाभार्थ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असला, तरी सहा व सात मे रोजी आलेल्या अचानक वादळ आणि पावसामुळे अनेक लाभार्थ्यांचा संसार उघड्यावर आला आहे.

घरकुल मंजुरी व आर्थिक लाभ

या योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना चार हप्त्यांत एकूण १,२०,००० रुपये मिळतात. तसेच ९० दिवसांच्या कालावधीत प्रति दिवस ३१२ रुपये मजुरीही मंजूर आहे.
पहिला हप्ता: १२,७४५ लाभार्थ्यांना प्रत्येकी १५,००० रुपये
दुसरा हप्ता: ५,६१२ लाभार्थ्यांना प्रत्येकी ७०,००० रुपये
तिसरा हप्ता: १,१९९ लाभार्थ्यांना प्रत्येकी ३०,००० रुपयांचा हप्ता वितरित

जन मन योजनेतून कातकरी समाजासाठी विशेष प्रावधान

विमुक्त जमातीतील कातकरी समाजासाठी ‘जन मन’ योजनेतून १,१११ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यांचा समाजव्यवस्थेत स्थैर्य निर्माण करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरते आहे.

संपत्ती नाही, संरक्षण नाही वादळी पावसात संसार उघड्यावर

पहिला हप्ता मिळाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी जुनं मातीचं किंवा कौलारू घर तोडून त्या जागी नव्या घरकुलाची उभारणी सुरू केली. मात्र यावेळी स्थायी बांधकाम सुरु करता येत नसल्याने त्यांनी तात्पुरता प्लास्टिकचा शेड किंवा झोपड्या उभारल्या होत्या. अचानक आलेल्या वादळामुळे या झोपड्या उद्ध्वस्त झाल्या, आणि अनेकांचा संसार उघड्यावर आला. ग्रामीण भागात तात्पुरता निवारा हवामानाच्या तडाख्याने उडून गेला आहे. त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुले प्रचंड गैरसोयींना सामोरे जात आहेत.

उत्तम योजना, पण हवामानाचा विचार नसलेली अंमलबजावणी

प्रधानमंत्री आवास योजना, शबरी योजना आणि जन मन या तीन योजनांचे उद्दिष्ट प्रशंसनीय असले, तरी अंमलबजावणीत हवामानाशी संबंधित धोके, बांधकाम सुरू होईपर्यंतची तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था, आणि संकटाच्या वेळी मदत या बाबतीत उणीव जाणवत आहे.

प्रशासनाने तातडीने मदत करावी नागरिकांची मागणी

पावसामुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना तात्पुरता निवारा, जीवनावश्यक वस्तू आणि घरकुल बांधकामासाठी वेगाने पुढील हप्ते वितरित करावेत, अशी मागणी होत आहे. शासनाच्या योजनांमुळे नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळतो आहे, पण प्रत्यक्षात घर बांधण्याच्या काळात त्यांचं संरक्षण करणे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाने दिलेल्या निकषानुसारच घरकुलाच्या पाया खोदल्यापासून जसे जसे घरकुलाची बांधकाम सुरू होईल तसे पहिला, दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यात घरकुलधारकांना त्या घरकुलाचे पैसे अदा करण्यात येत असतात, काही लाभार्थ्यांना पहिला व दुसऱ्या रकमेचा चेक देखील अदा करण्यात आलेला आहे. – पल्लवी सस्ते, गटविकास अधिकारी डहाणू