पालघर : बोईसर भिमनगर परिसरात पश्चिम रेल्वेने मालवाहू यार्ड उभारण्याचे काम हाती घेतल्याने या प्रकल्पाच्या नियोजित ठिकाणी साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा सुलभ पद्धतीने करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जलचिन्हांकित (हायड्रोग्राफिक) सर्वेक्षण हाती घेतले असून त्याचा अहवाल पुढील काही दिवसात हाती येणार आहे. दरम्यान या परिसरात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा प्रवाह भिमनगर मधून वाहणाऱ्या नाल्यातून मर्यादित राहावा या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने उपाय योजना हाती घेतल्या आहेत.

मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन मार्फत पश्चिम रेल्वेचे चौपदरीकरण प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पा अंतर्गत बोईसर रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेच्या बाजूला असणाऱ्या मालवाहू यार्डाचे स्थलांतर बीएआरसी रहिवासी वसाहत व भिमनगर मध्ये मालवाहू फलाट उभारून करण्यात येणार आहे. या दृष्टीने मोठ्या प्रमाणात माती मुरूम भराव करण्यात आला असून या प्रकल्पामुळे भिमनगर परिसरातील घरांमध्ये पावसाचे पाणी जाऊन सातत्याने पूर परिस्थिती निर्माण होईल याकडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र भोणे यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

या संदर्भात रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यानी प्रकल्पाच्या स्थळी संयुक्त भेट देऊन प्रकल्पाच्या उत्तरेच्या बाजूने वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यांमधील पावसाचे पाणी तसेच यार्ड उभारण्याच्या ठिकाणी भराव टाकल्यामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक नाल्यातील प्रवाहावर होणारा परिणाम भिमनगर वसाहतीवर होईल याबाबत स्थळपाहणी केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तज्ज्ञांच्या मार्फत जलचिन्हांकित सर्वेक्षण हाती घेतले आहे.

सर्वेक्षणाच्या दरम्यान रेल्वे प्रशासनाने यार्डाच्या पूर्वेच्या बाजूला गणेशनगर, भिमनगर व काटकर पाड्याच्या मधोमध एक मोठ्या आकाराचा खड्डा (तलाव) उभारून त्यामध्ये पाणी साठवण्याची तरतूद केली आहे. या तलावातून पाणी भिमनगरच्या बाजूला जाऊ नये म्हणून आवश्यक तात्पुरत्या स्वरूपाची बांध उभारून पावसाचा जोर कमी असल्यास नियंत्रित पद्धतीने पाणी भिमनगर येथील वाहणाऱ्या नैसर्गिक ओहोळात सोडण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. पावसाचा जोर असल्यास मोटर पंपाद्वारे या ठिकाणी शासनाने पाणी गणेश नगरच्या पूर्वेकडे अथवा दलाल टावरच्या पुढे वाहणाऱ्या नैसर्गिक ओहळात सोडण्यासाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात अंतिम अहवाल पुढील काही दिवसात उपलब्ध होण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हा प्रशासनाची समन्वय साधून या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आखल्या जातील असे मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी लोकसत्ता ला सांगितले. जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाय योजना आखल्याने भिमनगर व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.