पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात रविवार (१५ जून) रोजी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे (महालक्ष्मी) उड्डाणपुलाच्या मध्यभागावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून पुलाला तळ्याचे स्वरूप आले होते. पुलावर काही फूट पाणी साचल्यामुळे दोन्ही वाहिनीवरील वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. यामुळे एक अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारामुळे पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ५५० कोटी रुपयांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पा अंतर्गत डहाणू तालुक्यातील विवळवेढे (महालक्ष्मी) येथील साधारण ७४० मिटर उड्डाणपुलावर काँक्रीटीकरण करण्यात आले. २०० मिलिमीटर काँक्रीट चा थर पूर्वीच्या डांबरी रस्त्यावर अंथरताना योग्य मोजमाप घेऊन काम करण्यात आलेले नाही. यामुळे उड्डाणपुलावर तीव्र वळणाच्या ठिकाणी खोलगट भाग तयार झाला आहे. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असणारे भोक या काँक्रिटीकरणामुळे काही प्रमाणात बुजली गेली.

परिणामी या खोलगट भागात पुलाच्या बऱ्याचश्या भागातील पावसाचे पाणी साचले होते. एकाच ठिकाणी पाणी साचल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे वाहतूक खोळंबली असून महामार्ग प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी पुलावर येत पाण्याच्या निचरा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

पुलावरून वाहतूक संथ गतीने सुरू असताना मुंबई वाहिनीवरून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रक चालकाने समोरील वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात धडक देणाऱ्या ट्रक मधील चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा एक पाय मोडल्याची माहिती देण्यात आली. स्थानिक पोलीस आणि महामार्ग प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत जखमीला तत्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून अपघातग्रस्त वाहन बाजूला काढले आहे. तरी संध्याकाळी ७.३० पर्यंत पुलावर पाणी साचलेले असून वाहतूक संथ गतीने सुरू होती.

राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण करताना डांबरी रस्त्यावरच काँक्रीटीकरण करण्यात आले होते. यावेळी कामाचे नियोजन करताना पावसाच्या पाण्याचा निचरा करणे, सुरक्षा रक्षक कठडे, दुभाजक आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित न केल्यामुळे पहिल्याच पावसात महामार्ग प्रशासनाच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. विवळवेढे सह अन्य काही उड्डाणपुलांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पहिल्याच पावसात महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुलावर पाणी साचल्यामुळे पुलाला धोका

श्री महालक्ष्मी मंदिरासमोर असणारा हा उड्डाणपूल जमिनीपासून २० ते ३० फूट उंचीवर असून या पुलाच्या उभारणीत मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. पावसाचे पाणी दीर्घकाळ पुलावर साचल्यास त्याचा पुलाच्या भरावांमध्ये निचरा होऊन पुलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरण प्रकल्पात नियोजनाचा अभाव या प्रकारामुळे उघडकीस आला आहे.