पालघर : राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन परियोजना व नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टिकोनातून पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या ३९ गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्प राबवण्यासाठी १८६ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे सातपाटी येथे प्रायोगिक तत्वावर काम झाले आहे. मात्र प्रत्यक्षात ३९ गावांकरिता भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर निविदा प्रक्रिया होणे प्रतीक्षेत आहे.

पालघर जिल्ह्यात आठ तालुके असून पालघर जिल्ह्याला ११२ किलोमीटर लांबीचा वसई, पालघर व डहाणू या तालुक्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. जिल्ह्यात वसई, नायगाव, कोळीवाडा पासून ते तलासरी, झाई, बोर्डी पर्यंत हा संपूर्ण समुद्रकिनारा विस्तारला आहे. समुद्रकिनारी सतत येणाऱ्या चक्रीवादळामुळे या भागात विद्युत खांब, तारा, रोहित्र यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसा दरम्यान देखील समुद्र किनारपट्टीच्या भागांना वादळीवाऱ्याचा तडाखा बसल्याने विद्युत वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे दोन ते तीन दिवस या भागातील वीज खंडित राहिली होती.

सुसाट वाऱ्यामुळे तसेच त्या ठिकाणी खाऱ्या पाण्यामुळे किनारपट्टीच्या भागातील विजेच्या तारा गंजून आणि एकमेकांना घर्षण होऊन त्या वारंवार तुटतात. तसेच पावसाळ्या दरम्यान सुसाट्याचा वाराने विद्युत खांब व तारा तुटून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असतात. अशा समस्या उद्भवू नये या दृष्टीने समुद्रकिनाऱ्याच्या पट्ट्यामध्ये भूमिगत वीज तारा करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी मागणी केली होती.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला प्रश्न

तसेच या संदर्भात आमदार राजेंद्र गावित यांनी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नावर पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील लोकांच्या विजेच्या गंभीर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत अंदाजे ५००० कोटी रुपयांच्या या कार्यक्रमात संपूर्ण किनारपट्टी भागातील विजेच्या तारा या भूमिगत करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले होते.

राज्यस्तरावर निविदा प्रक्रिया रखडली

जिल्ह्यातील भूमिगत विद्युत वाहिनीकरिता १८६ कोटीचा सविस्तर प्रकल्प अहवाल मागील वर्षी मंजूर झाला आहे. मात्र या कामासाठी मंत्रालय स्तरावर निविदा प्रक्रिया पार पडणार असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. विविध प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम एजन्सीकडे देण्यात येईल. वसईच्या काही भागांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे तर सातपाटी येथे प्रायोगिक तत्त्वावर भूमिगत वाहिन्या करण्यात आल्या आहेत.

महावितरण कर्मचाऱ्यांना फायदा

भूमिगत विद्युत वाहिन्याचे काम झाल्यास याचा सर्वाधिक फायदा महावितरण कर्मचाऱ्यांना होणार आहे. मागील आठवड्यात अर्नाळा येथे विद्युत वाहिनीचे काम करताना महावितरण कर्मचाऱ्याला विजेचा झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. विद्युत वाहिनी जळणे, विद्युत तारा खंडित होणे, खांब पडणे व रोहित्रमध्ये बिघाड होणे या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांची सुरक्षितता देखील जपली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समुद्र किनारपट्टी पासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिनीचे काम करण्यात येणार आहे. मंत्रालय स्तरावर निविदा मंजूर होणे बाकी आहे. भूमिगत विद्युत वाहिन्या झाल्यानंतर वादळी वाऱ्यादरम्यान होणारे नुकसान पूर्णतः बंद होणार आहे.सुनील भारंबे, कार्यकारी अभियंता महावितरण