सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बऱ्याच काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उद्या (सोमवारी) होणारा नांदेड दौरा आगामी निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजपासाठी महत्त्वाचा आहे. नांदेडमधील सभेतून अमित शाह महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा शंखनाद करण्याची शक्यता आहे. भाजपा उमेदवारांसाठी ही भेट किती महत्त्वाची आहे? त्याविषयी समजून घेऊ…

अमित शाहांचा नांदेड दौरा

राज्य निवडणूक आयोगाने अद्याप आपले वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. सध्याच्या २७ महानगरपालिकांसह इचलकरंजी व जालनातील दोन नव्याने निर्माण झालेल्या महानगरपालिका आणि पंचायत पातळीपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) सक्रिय झाले आहेत.

नांदेडमध्ये अमित शाह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत वरिष्ठ भाजपा नेत्यांबरोबर बैठका घेणार आहेत आणि त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करण्याचीही शक्यता आहे. भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, “भाजपासाठी प्रत्येक निवडणूक महत्त्वाची आहे. मग ती लोकसभा निवडणूक असो, विधानसभा निवडणूक असो किंवा महानगरपालिका. निवडणुकांसाठी राज्य आणि केंद्रीय नेतृत्व दोघेही एकत्रितपणे रणनीती आखतात व ती अमलात आणतात.”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नांदेडचे महत्त्व

नांदेडमध्ये प्रसिद्ध हजूर साहिब गुरुद्वारा आहे. नांदेडला शहर काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते, ज्यांचा वारसा त्यांचे पुत्र ज्येष्ठ भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुढे नेत आहेत. दोन वेळा नांदेडचे लोकसभा खासदार राहिलेले अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारी २०२४ मध्ये काँग्रेसला राम राम ठोकला आणि ते भाजपामध्ये सामील झाले. भाजपाने त्यांना लवकरच राज्यसभेवर उमेदवारी दिली. त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनी भाजपाच्या तिकिटावर भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या.

नांदेडमधील सभेला अमित शाह संबोधित करणार असल्याने अशोक चव्हाण यांच्याकडून त्यांच्या गृहभूमीवर शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल, हे निश्चित. अमित शाह यांच्या भेटीपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमधील अनेक प्रमुख स्थानिक नेत्यांशी बैठका घेतल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांतील नेत्यांना भाजपामध्ये सामील करून घेण्यासाठीची भाजपाची रणनीती म्हणून या बैठकांकडे पाहिले जात आहे. नांदेडमधील माजी आमदारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार)च्या काही नेत्यांशी आम्ही चर्चा करीत आहोत. अमित शाह यांच्या भेटीदरम्यान त्यांना भाजपामध्ये सामील केले जाणार असल्याचे चव्हाण यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने सांगितले आहे.

विरोधी पक्षांमधील नेत्यांना भाजपामध्ये सामील करून घेण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांवर प्रदेश भाजपा प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “जर इतर पक्षांतील कोणी भाजपामध्ये येऊन काम करण्यास इच्छुक असेल, तर आम्ही त्यांचे स्वागत करू. जर पक्षाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकसित भारताच्या विकासात अधिक लोक हातभार लावू इच्छित असतील, तर ते भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगले आहे.”

अशोक चव्हाण आता भाजपाच्या बाजूने असल्याने काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यात भाजपाने पाय रोवले आहेत. लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा प्रभाव दिसून आला नाही आणि परिणामी भाजपाला नांदेड मतदारसंघ गमवावा लागला; परंतु, नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रभाव दिसून आला. विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला एकत्रितपणे नांदेड जिल्ह्यातून काँग्रेसचा सुपडा साफ करण्यात यश आले. नांदेडमध्ये भाजपाने चार विधानसभा मतदारसंघ जिंकले; तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने उर्वरित दोन मतदारसंघ जिंकले.

आता येणाऱ्या निवडणुकीत नांदेड वाघाळा महानगरपालिकेची ही लढाई अशोक चव्हाण आणि भाजपासाठी आव्हान असणार आहे. १९९७ मध्ये स्थापन झालेली नांदेड वाघाळा महानगरपालिकादेखील काँग्रेसचा बालेकिल्ला राहिली आहे. गेल्या २८ वर्षांत भाजपाला नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत कधीही विजय मिळविता आलेला नाही. केवळ १९९७ ते ९८ मध्येच या ठिकाणी शिवसेना काही काळासाठी सत्तेत होती. २०१७ मध्ये झालेल्या अखेरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर नांदेड वाघाळा महानगरपालिकेचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विलंब झाल्यामुळे सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकाद्वारे सध्या येथील कामकाज सुरू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जागावाटप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्या महायुतीतील मित्रपक्ष म्हणजेच शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर लढवेल. परंतु, जिथे स्थानिक पक्ष मित्रपक्षांबरोबर लढण्यास तयार नसतील, तिथे शिष्टाचार राखण्यासाठी फडणवीस यांनी प्रचाराचे आवाहन केले आहे. तसेच निवडणुकीनंतर पक्ष युती करण्यासाठी एकत्र येतील, असेही त्यांनी सांगितले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “जागावाटपाशी संबंधित सर्व चर्चा वरिष्ठ नेतृत्वाखाली होतील. आम्ही आमच्या स्थानिक घटकांच्या युतींबद्दलच्या मतांचा पुरेसा विचार करू.” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांना त्यांच्या स्वतःच्या पक्षाची ताकद दाखविण्याची एक संधी असेल. उदाहरणार्थ- शिवसेनेने अलीकडेच पक्षाच्या बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) २२७ जागांपैकी १०० जागांची मागणी केली. याबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही आणि त्यामुळे भाजपानेही यासंबंधीचे राजकीय दावे फेटाळून लावले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणतीही फूट न पडता, निवडणुका व्यवस्थापित करण्यात अमित शाह यांची महत्त्वाची भूमिका असण्याची शक्यता आहे. परंतु, मुंबई, पुणे व नागपूरसह राज्यातील किमान १६ महानगरपालिकांमधील भाजपा युनिट्सचे प्राथमिक मत आहे की, पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मित्रपक्षांशिवाय लढवाव्यात, असे पक्षाच्या एका सूत्राने सांगितले आहे.