अमरावती : शेतकरी, दिव्यांग, मच्छिमार, मेंढपाळांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे २८ ऑक्टोबरला मोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाला ‘महाएल्गार’ असे नाव देण्यात आले आहे. या आंदोलनाचा उद्देश सरकारला संपूर्ण कर्जमाफी देण्यास आणि सर्व मागण्या मान्य करण्यास बाध्य करणे हा असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगरात सरकारची कोंडी करण्याचा बच्चू कडू यांचा प्रयत्न आहे.
या ‘महाएल्गार’ आंदोलनात ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे अध्यक्ष विठ्ठलराजे पवार आदी सहभागी होणार आहेत.
बच्चू कडू यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना नागपुरातील परसोडी वर्धा रोड, जामठा येथील कापूस संशोधन केंद्राच्या बाजूच्या मैदानावर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
पंजाबमधील आंदोलनाच्या ताकदीचे आंदोलन करण्याची आमची मानसिकता असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहोत. शेतमाल हमीभावापेक्षा कमी किंमतीत विकावा लागतो. शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहचत नाहीत. शेतकरी आता अधिक कर्जबाजारी होत आहे, तरीही कर्जमाफीची योग्य वेळ येत नाही, हे दुर्देव असल्याची टीका बच्चू कडू सातत्याने सभांमधून करीत आहेत. महिनाभरात त्यांनी राज्यात अनेक सभांचे आयोजन केले. त्यात सरकारविरोधातील टीकेची धार अधिक तीव्र होत गेली आहे. काही सभांमधील त्यांची विधाने अत्यंत वादग्रस्त ठरली.
‘शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना मारा, कापा’, या त्यांच्या वक्तव्यावरून वादळ उठले. त्यांच्यावर अनेक नेत्यांनी टीका केली. आमदाराला कापा बोललो तर राग येतो, मग रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित करत बच्चू कडू यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. तीन हजार रुपयांनी सोयाबीन विकावे लागते, सहा हजार रुपयांनी कापूस विकावा लागतो, यावर कुणी बोलत नाही. पंजाबमध्ये ९५ टक्के शेती माल हमीभावाने खरेदी केला जातो. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचा माल २२०० ते १५०० रुपयांनी विकावा लागतो. या लोकांची पूजा करायची का? असा त्यांचा प्रश्न आहे.
संत्रा, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट असून त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुळापासून धोरणे बदलली पाहिजेत, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. गेल्या जून महिन्यात बच्चू कडू यांनी गुरूकूंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. शेतकरी कर्जमाफीसह विविध १७ मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले. सरकारच्या लेखी आश्वासनानंतर बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले, पण आता मुख्यमंत्र्यांना त्यांच्या गृहनगरात घेराव घालण्याचा आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा बच्चू कडूंचा प्रयत्न राहणार आहे.
