केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्या कार्यक्रमात त्यांनी शिवसेनेचे (अविभाजित) संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तराचे कौतुक यावेळी शाह यांनी केले. यावेळी ते म्हणाले, “भारतीय सैन्याच्या कामगिरीने केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर जगाला हा संदेश दिला आहे की, कोणीही भारताच्या सशस्त्र दलांशी, त्यांच्या जनतेशी आणि सीमांशी गोंधळ घालू शकत नाही.”
अमित शाह यांनी यावेळी राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरवर सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरात पाठविण्याच्या निर्णयाची तुलना त्यांनी वरातीशी केली होती. पक्षाचे सदस्य या शिष्टमंडळात असूनही राऊत यांनी या निर्णयावर टीका केली होती. दरम्यान, बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर अमित शाह म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली असती आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशाला त्यांनी मनापासून पाठिंबा दिला असता.”
“ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींनी ठरवले की, हा देशाचा प्रश्न आहे. म्हणूनच खासदारांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांना भेट देईल आणि पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा करील. त्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आले. या निर्णयानंतर शिवसेनेच्या (उबाठा) संजय राऊत यांनी शिष्टमंडळाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले, ” ‘ये किसकी बारात जा रही है?…’ शिवसेना (उबाठा) हा पूर्वी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष होता. बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी मोदींना मिठी मारली असती. उद्धव सेनेचे काय झाले आहे हे मला माहीत नाही. त्यांच्याच पक्षाचे सदस्य त्यात सहभागी असूनही ते शिष्टमंडळांना बारात म्हणत आहेत”, असे त्यांनी एएनआयशी बोलताना म्हटले. “ऑपरेशन सिंदूरने केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर जगाला हा संदेश दिला आहे की, कोणीही आपली सशस्त्र दले, जनता आणि सीमेसंबंधात गोंधळ घालू शकत नाही; अन्यथा गुन्हेगारांना परिणाम भोगावे लागतील”, असेही शाह म्हणाले.
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्याच्या भ्याडपणाचे वर्णन करताना शाह म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटण्यामध्ये म्हटले होते की, गुन्हेगार जिथे जिथे लपले असतील, तिथून त्यांचा माग काढला जाईल. पाकिस्तान हे विसरलाय की, ११ वर्षांपूर्वी काँग्रेसचे सरकार होते आणि आता सरकार बदलले आहे. आम्ही उरी, पुलवामा व पहलगाम हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आणि दहशतवादी तळांवर हल्ले केले.” “जर निष्पाप भारतीय नागरिकांचे रक्त सांडले, तर प्रत्युत्तर दिले जाईल, असे मोदीजींनी जाहीर केले आहे. जर आपल्या महिलांच्या कुंकवाला इजा झाली, तर त्याचं प्रत्युत्तर अधिक रक्तरंजित असेल”, असे शाह म्हणाले. ऑपरेशन सिंदूरने भारताच्या सीमांचे रक्षण करण्याची सरकारची वचनबद्धता सिद्ध केली.
संजय राऊत काय म्हणाले?
गेल्या आठवड्यात राऊत यांनी ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानसोबतच्या भारताच्या लष्करी तणावाबद्दल इतर देशांना माहिती देण्यासाठी संसद सदस्यांना परदेशात पाठविण्याची गरज का आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “ही वरात पाठविण्याची गरज नव्हती. पंतप्रधान कमकुवत आहेत. घाई करण्याची गरज नव्हती. उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा (खासदार श्रीकांत शिंदे) परदेशात काय प्रतिनिधित्व करील?” असे राऊत यांनी विचारले होते. “भाजपाने याचे राजकारण केले आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय आहे. पक्षांनी यावर बहिष्कार टाकावा”, असेही राऊत म्हणाले.
विविध पक्षांचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री यांच्यासह ५० हून अधिक सदस्यांनी युरोप, अमेरिका आणि आखाती देशांमधील शहरांमध्ये पाठविल्या गेलेल्या शिष्टमंडळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पाकिस्तानवर राजनैतिक दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या दौऱ्यात काँग्रेसचे शशी थरूर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या सुप्रिया सुळे, शिवसेनेच्या (उबाठा) प्रियांका चतुर्वेदी, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी व द्रमुकच्या कनिमोई अशा अनेक सदस्यांचा समावेश आहे.