गेल्या निवडणुकीत वसई विकास आघाडी व नंतर बहुजन विकास आघाडीचे ‘शिट्टी’ हे पारंपरिक चिन्ह अन्य उमेदवाराला मिळाल्याने ‘रिक्षा’ या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे नेते अधिकच सावध झाले. यासाठीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होताच घाईघाईत बहुजन विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या वतीने दुपारी बारा वाजताच्या मुहूर्तावर अर्ज दाखल केला. ही सारी धडपड शिट्टी चिन्ह मिळावे यासाठी. बहुजन विकास आघाडी राज्यव्यापी मान्यताप्राप्त पक्ष नसल्याने एकच चिन्ह मिळेल अशी खात्री नसते. पहिला येईल त्याला प्राधान्य यानुसारच बविआने शिट्टीवर दावा केला आहे.

सुकाळ छायाचित्रांचा

लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार संघर्ष होत आहे. पूर्वी काँग्रेस आणि भाजप अशी दोन मुख्य पक्षांमध्ये विभागणी होती. तेव्हा सभास्थळी वा प्रचार पत्रकामध्ये राष्ट्रीय नेत्यांचा फोटो प्रकाशित केला की मग माझा फोटो का नाही, अशी कुरकुर प्रदेशाध्यक्षसुद्धा करीत नसायचे. फ्लेक्सचा जमाना अवतरण्यापूर्वी आताच्या सारखे सर्वांनाच सामावून घेणारे फोटोस्तोम बोकाळलेले नव्हते. हल्ली सारेच चित्र बदलले आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर एका महायुतीमध्ये तीन मुख्य पक्ष, शिवाय किती तरी मित्र, घटक पक्ष. महाविकास आघाडीची अवस्था अगदी अशीच. त्यामुळे होते असे की, सभास्थळावरील फलक असो की प्रचाराचे साहित्य. कोणालाही नाराज करायचे नसल्याने त्यावर फोटोंचा सुकाळ दिसून येतो. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळी या क्रमाने मुख्य पक्ष, त्याच्या जोडीला मित्र, घटक पक्षातील नेत्यांचे फोटोच फोटो. शिवाय महापुरुषांची लांबलचक फोटोंची मालिका. त्यातून उरलेल्या जागेत उमेदवाराचा फोटो, चिन्ह, ओळख, पक्ष यांचे दर्शन कसेबसे होणारे.

हेही वाचा >>>कलम ३७० वर काँग्रेसचे मौन तरीही आम्ही समजून घेतोय; ओमर अब्दुल्लांचं विधान

सोयीने वापर

महाविकास आघाडीचे नगरमधील उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची शेवगावमध्ये सभा झाली. या सभेच्या प्रचारार्थ फलकावर भाजपचे स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. माजी आमदार राजीव राजळे यांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला. त्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी हरकत घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. स्व. राजीव राजळे हे पूर्वी राष्ट्रवादीचे पाथर्डी-शेवगावचे आमदार होते. मात्र त्यांच्या पत्नी मोनिका राजळे या सध्या भाजपच्या शेवगाव-पाथर्डीमधील आमदार आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ महायुतीने नगर शहरात काढलेल्या प्रचार फेरीत शिवसेनेचे दिवंगत उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांचा जयजयकार करण्यात आला. राठोड यांनी नगर शहरावर दीर्घकाळ राज्य केले. मुंडे यांचाही वंजारी समाजावरील वर्चस्वामुळे पाथर्डी-शेवगाव परिसरावर प्रभाव होताच. मुंडे, राठोड व राजळे यांचे शिवसेना, राष्ट्रवादीमधील फुटीपूर्वी निधन झालेले आहे. काळाच्या पडद्याआड गेलेल्या नेत्यांचा आता फुटीनंतर जो तो आपल्या सोयीने वापर करू लागला आहे.

सबुरीचा सल्ला

हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचाराची सभा रविवारी शिराळ्यात झाली. सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर येईपर्यंत श्रोते थोपवून ठेवण्याचे काम माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत करत होते. बोलता बोलता त्यांनी सांगितले, खासदार माने भागात फिरत नसल्याचा आरोप होत असला तरी मागील पाच वर्षांतील दोन वर्षे करोनात गेली, आणि त्यानंतर राज्यातील सरकार बदलल्याने खासदार या बांधावर की त्या बांधावर हे ठरविण्यात काही दिवस गेले. यामुळे दर्शन दुर्मीळ झाले असे वाटत असले तरी आरोप करणारे कुठं रोज तुमचं-आमचं शेण-घाण काढायला येणार हायत? जरा सबुरीनं घ्या, मुख्यमंत्री म्हणजे कर्ण हायत आणि महाभारतातला अर्जुन म्हणजी आपलं देवेंद्र भौ. आता कर्ण दाता असला तरी सत्पात्री दान कुणाकडनं मिळतंय अन् कुणाच्या पदरात हे जाणत्यांना सांगायला नगं.

(संकलन मोहनीराज लहाडे, नीरज राऊत, दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे)