अलिबाग- विधानसभा निवडणूकीनंतर शेकापच्या साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या जे एम म्हात्रे यांच्या मागे लागलेला सक्त वसूली संचनालयाचा ससेमिरा सुटलेला नाही. वनजमिन विक्री घोटाळा प्रकरणात ईडीच्या पथकांनी नुकतीच छापेमारी करत म्हात्रे भोवती कारवाईचा फास आवळला आहे. त्यामुळे शेकापची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करून नेमके काय साध्य केले असा प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
पनवेल तालुक्यातील १.८६ हेक्टर वन जमिनी बनावट नोंदीव्दारे ताब्यात घेऊन संबधित जमिन नंतर महामार्ग प्राधिकरणाला ४२.२ कोटी रुपयांना २००५ मध्ये विकल्याची बाब समोर आली होती. अलिबाग वन परिक्षेत्रातील उरण विभागाच्या वन अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी २०२४ मध्ये पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ईडीने आर्थिक गैरव्यवहाराच्या अनुशंगाने तपास सरू केला होता. या प्रकरणात कारवाईची होण्याची शक्यता लक्षात येताच जे एम म्हात्रे यांनी शेकापची साथ सोडत अगदी अलिकडच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपमध्ये प्रवेश केल्यावर कारवाई थांबेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र तसे झाले नाही. ईडीच्या पथकांनी या आर्थिक घोटाळ्याशी निगडीत पनवेल आणि दादर येथे धाडी टाकल्या. घोटाळ्याची साखळी उलगडण्यासाठी जमिनीचे मूळ दस्तऐवज, आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे आणि बॅंक खात्यांची माहिती आणि संगणकीय टेडा जप्त करण्यात येत आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण काही दिवसांपूर्वीच जे एम म्हात्रे हे रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाला अखेरचा लाल सलाम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतर या वन जमिन घोटाळा प्रकरणातून सुटका होईल अशी अपेक्षा म्हात्रे यांना होती. मात्र तसे झाले नाही, पक्षप्रवेशाच्या एक महिन्यानंतर ईडीच्या छापेमारी केली आहे. त्यामुळे म्हात्रे यांच्या अडचणीत आणखिन वाढ होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूकीत ज एम म्हात्रे यांचा मुलगा प्रितम म्हात्रे यांने उरण मतदारसंघातून भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. शिवसेना ठाकरे गटाचा तिसरा उमेदवार नसता तर भाजपच्या बालदी यांचा पराभव निश्चित मानला जात होता. मात्र महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांतील मतविभाजन बालदी यांच्या पथ्यावर पडले आणि ते पुन्हा निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रितम म्हात्रे यांनी उरण मधून शेकापकडून निवडणुक लढवू नये यासाठीच भाजप प्रयत्नशील होती. मात्र उरण मधून भाजपच्या महेश बालदी यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याबाबत प्रितम म्हात्रे ठाम होते. त्यामुळे विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी हे प्रकरण बाहेर काढले होते. हे प्रकरण अडचणीचे ठरू शकते असे लक्षात येताच म्हात्रे पितापुत्रांनी महाविकास आघाडी आणि शेकापमधून बाहेर पडत भाजपात प्रवेश केला होता.