AAP vs Congress in Ludhiana West bypoll : देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेला भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची मोट बांधली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढून त्यांनी भाजपाला स्वबळावर बहुमत मिळविण्यापासून रोखलं. मात्र, त्यानंतर झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधीपक्षांमध्ये संगनमत झालं नाही. परिणामी त्यांनी स्वबळावर निवडणुक लढविल्याने याचा मोठा फायदा भाजपाला झाल्याचं दिसून आलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्वबळावर बहुमत मिळवून राजधानीत तब्बल २७ वर्षानंतर सत्तास्थापन केली. तर काँग्रेस व आम आदमी पार्टीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. हरियाणातही असंच काहीसं चित्र दिसून आलं.
दरम्यान, येत्या १९ जून रोजी पंजाबच्या लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी, भाजपा, काँग्रेस व अकाली दलाने आपापले उमेदवारी जाहीर केले आहेत. पंजाबमध्ये सध्या आम आदमी पार्टीचे सरकार आहे. चौरंगी पोटनिवडणूक होत असलेल्या लुधियाना मतदारसंघात काँग्रेस व आम आदमी पार्टीने एकमेकांचे पाय खेचण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही पक्षांनी परस्परांवर टीका करताना “राग आणि अहंकार” यांसारख्या मुद्द्यांवरून एकमेकांना डिवचलं आहे. दरम्यान, आप-काँग्रेसमधील या भांडणाचा भाजपाला मोठा फायदा होऊ शकतो, असं भाकित राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत.
पंजाबमध्ये आप विरुद्ध काँग्रेस
लुधियाना विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने माजी मंत्री भारत भूषण आशू, भाजपाने जीवन गुप्ता आणि शिरोमणी अकाली दलाने परोपकर सिंग आणि यांना उमेदवारी दिली आहे. भारत भूषण आशू हे कोणत्याही कारणामुळे लवकर चिडतात त्यांचा स्वभाव अहंकारी आहे, असं म्हणत आम आदमी पार्टीने काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात जोरदार प्रचार सुरू केला आहे. ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही एका नुकत्याच झालेल्या रोड शोमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराच्या राग आणि अहंकाराचा उल्लेख केला.
आणखी वाचा : भाजपाचं ‘या’ राज्यातील सरकार गोत्यात? मुख्यमंत्र्यांविरोधात मोठं आंदोलन होणार?
उपस्थितांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, “२०२२ मध्ये तुम्ही काँग्रेस उमेदवाराचे उमेदवार भारत भूषण आशू यांच्या राग आणि अहंकाराविरुद्ध मतदान करून ‘आप’चे उमेदवार गुरप्रीत गोगी यांना निवडून दिलं. त्यांनी मतदारसंघात चांगली विकासकामेही केली. परंतु, दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला. जर तुम्हाला तुमच्यासाठी काम करणारा नेता हवा असेल, तर संजीव अरोरा यांना मतदान करा.”
गुरप्रीत गोगी यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक
आम आदमी पार्टीचे दिवंगत आमदार गुरप्रीत गोगी यांच्या निधनानंतर लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. आमदार गोगी यांचा जानेवारीमध्ये मृत्यू झाला होता. स्वत:ची बंदूक साफ करताना अचानक बंदुकीतून गोळी सुटल्याने त्यांना आपले प्राण गमावावे लागले होते. फेब्रुवारीत दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली होती आणि त्यात आम आदमी पार्टीला भाजपाकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी आपने लुधियानाची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे सध्या लुधियानात ठाण मांडून आहेत.
राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षही या निवडणुकीत पूर्णपणे ताकदीने उतरला आहे. अलीकडेच झालेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीचं या भागातील प्रदर्शन निराशाजनक राहिलेलं आहे. मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’ला लुधियाना लोकसभा मतदारसंघातील नऊ विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली नव्हती. परिणामी ही जागा काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी जिंकली होती. काही महिन्यांनी, लुधियाना महापालिका निवडणुकीतही आम आदमी पार्टीला बहुमत मिळवण्यात अपयश आलं.
‘आप’च्या टीकेला काँग्रेसचं प्रत्युत्तर
आम आदमी पार्टीने केलेल्या टीकेवर पलटवार करताना काँग्रेसचे उमेदवार भारत भूषण आशू यांनी स्वतःच एक घोषणा दिली आहे. “विकास आणि विश्वासासाठी, आशू हवाच!” असं ते आपल्या प्रचारातून मतदारांना सांगत आहेत. २०२२ मध्ये एका कथित अन्नधान्य घोटाळ्याप्रकरणी आशू यांना ११ महिन्यांसाठी तुरुंगात डांबण्यात आले होते, परंतु पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली. दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आशू यांनी आरोप केला की, गेल्या तीन वर्षांत ‘आप’ सरकारने राज्यात कोणतीही विकासकामे केलेली नाहीत. मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांच्या सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. ते पुढे म्हणाले, “याआधी आपचे नेते मला भ्रष्ट व बेईमान म्हणत होते. आता न्यायालयाने माझ्यावरील खोटे खटले बंद केल्यानंतर ते स्वप्नातसुद्धा मला बेईमान म्हणू शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी ‘राग आणि अहंकार’ हाच मुद्दा पुढे केला आहे.”
हेही वाचा : शरद पवार आणि अजित पवारांची ‘राष्ट्रवादी’ एकत्र येणार? विलिनीकरणाची का होतेय चर्चा?
पोटनिवडणुकीत भाजपाला होणार मोठा फायदा?
लुधियानाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपानेही चांगलीच कंबर कसली असून जीवन गुप्ता यांचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. आम आदमी पार्टी व काँग्रेसमधील भांडणात भाजपाच्या उमेदवाराला मोठा फायदा होऊ शकतो, असं मत हरियाणातील राजकीय विश्लेषक मांडत आहेत. जीवन गुप्ता यांनी सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपाने हॉटेल गुलमोहरजवळ एक जाहीर सभाही आयोजित केली होती. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड म्हणाले की, पक्षाने पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रामाणिक आणि कष्टाळू जीवन गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना मतदान करून विधानसभेत पाठवण्याची संधी आहे. २०२७ मध्ये पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाचा हा विजय एक मैलाचा दगड ठरेल.
अरविंद केजरीवालांचं ‘ते’ स्वप्न भंगणार?
सत्ताधारी आम आदमी पार्टीसाठी लुधियानाची पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. कारण, या पोटनिवडणुकीत ‘आप’ने पक्षाचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना उमेदवारी दिली आहे. जर अरोरा हे विजयी झाल्यास त्यांना मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते. राज्यसभेची जागा खाली झाल्यानंतर त्यांच्याजागी अरविंद केजरीवाल हे राज्यसभेत जाऊ शकतात. दिल्ली विधानसभेत पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवालांकडे कोणतेही महत्त्वाचे पद नाही. दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदही आतिशी सिंह यांना देण्यात आले आहे. जर अरोरा यांचा पराभव झाल्यास अरविंद केजरीवाल यांचे राज्यसभेचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.