दिगंबर शिंदे

सांगली : जिल्ह्यातील ४०९ गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून ऐन थंडीच्या दिवसात गावातील राजकीय वातावरण तापले आहे. निम्मा जिल्हा गावपातळीवरील निवडणुकींना सामोरा जात असल्याने आपले वर्चस्व अबाधित ठेवण्याबरोबरच वर्चस्व राखण्यासाठी गावकारभाऱ्यांना पाठबळ देत मतदार संघातील लोकमताचा कानोसा घेण्यासाठी आमदारही सरसावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून उमेदवारी माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. या वेळी मतदारातून थेट सरपंच निवड होणार असल्याने गावाची राजकीय दिशा कोणाची हे स्पष्ट होणार असल्याने दुय्यम फळीसह आमदार पदावर डोळा असलेले नेतेही या निवडणुकीत आपली ताकद अजमावत आहेत. पहिल्या टप्प्यात ३८ गावचे सरपंच आणि ५७० सदस्य अविरोध निवडून आले असून काही गावातील ग्रामपंचायती अविरोध करण्यात झाल्या आहेत. सर्वसमावेशक उमेदवार असल्याने या गावातील कल समजणार नसला, तरी यापुढील काळात सरपंच कोणत्या गटाचा यालाही महत्त्व राहणार आहे. याचबरोबर येत्या दोन-चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका असल्याने याचीही पेरणी या निवडणुकीच्या निमित्ताने केली जात आहे.

हेही वाचा >>>रायगडमध्ये ग्रामपंचायतीत शिंदे गटाचा वरचष्मा, ५० पैकी ३८ बिनविरोध ग्रामपंचायती बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे

वाळवा तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचा बालेकिल्ला. मात्र, या ठिकाणी या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही मोर्चेबांधणी आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवून केली आहे. वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश शिराळा विधानसभा मतदार संघामध्ये आहे. या ठिकाणी पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असल्याने भाजपकडून कोण याचे उत्तर देण्याचा प्रयत्न महाडिक गटाने पुढे येऊन दिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होऊनही अपक्ष मैदानात उतरून सम्राट महाडिक यांनी ५० हजार मते घेतली होती. यामुळे सत्यजित देशमुख यांच्या ऐवजी महाडिक यांची भाजप उमेदवारीवरील दावेदारी प्रबळ मानली जात आहे. या दृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून राहुल महाडिक यांच्या मदतीने गावपातळीवर आपला गट मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत जातीने लक्ष घातले आहे.

खानापूर-आटपाडी मतदार संघामध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात लढत होत आहे. आ. अनिल बाबर आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यात पारंपरिक लढत होत असून विटा नगरपालिकेत पाटील गट प्रबळ असला तरी ग्रामीण भाग बाबर यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. या वेळीही खानापूर या दोन गटांत तर आटपाडीमध्ये माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा गट, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना असा सामना होत आहे.

हेही वाचा >>>गुजरातमधील भाजपच्या यशात मराठी नेत्याची भूमिका महत्त्वाची

जतमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा लढती होत असल्या, तरी भाजप आणि राष्ट्रवादी यांचा विरोधक म्हणून काँग्रेस असेच पाहिले जात आहे. भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमगणोंडा रविपाटील यांनी भाजपसाठी मोर्चेबांधणी केली असून विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत हेही आपले स्थान अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ मध्ये स्व. आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटील आणि खासदार गटामध्ये कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवडीवरून राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला असून आमदार गटाला आपले वर्चस्व राखण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागत असून संजयकाका गट आगामी विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून खासदार पुत्र प्रभाकर पाटील यांच्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहे.

वाळवा मतदार संघामध्ये इस्लामपूर, आष्टा या नगरपालिकांचा समावेश अधिक मतदार संख्येमध्ये असला, तरी काही मिरज तालुक्यातील गावांचाही समावेश या मतदार संघात आहे. अप्पर सांगलीमधील ११ गावच्या निवडणुका या वेळी होत आहेत. आ. पाटील यांच्या दृष्टीने या गावातील निवडणूक महत्त्वाची मानली आहे. त्यांना शह देण्याचा प्रयत्न माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या माध्यमातून भाजप करीत आहे. पलूस कडेगावमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचा गट ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय झाला असून माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या गटाला शह देण्यासाठी या निवडणुकीचा वापर केला जाऊ शकतो. त्या दृष्टीने देशमुख गटाची मोर्चेबांधणी सुरू आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांचा गट कुंडल वगळता अन्यत्र फारसा सक्रिय दिसत नाही. मिरज तालुक्यात पालकमंत्री सुरेश खाडे यांचा स्वत:चा असा गट गावपातळीवर सक्रिय नाही. तरीही बदलत्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये नाराज झालेल्यांची मोठी फळी आता भाजपची म्हणून सक्रिय झाली आहे.

हेही वाचा >>>मोदींकडून शिंदे, फडणवीस यांच्यावर स्तुस्तीसुमने आणि गडकरींचा सहभाग शिष्टाचारापुरता

गावचे मिनी मंत्रालय म्हणून महत्त्व आहे. यातच वित्त आयोगाकडून थेट निधी ग्रामपंचायतींना प्राप्त होत असल्याने गावचा कारभार करण्यासाठी अनेक कारभारी पुढे येत आहेत. गावचा कारभार आपल्या हाती असावा असे त्याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती या निवडणुकीतील उमेदवारीसाठी दावेदारी प्रभावीपणे करता येत नाही. यामुळे अनेक दुय्यम फळीतील नेते या निवडणुकीसाठी ताकद पणाला लावत आहेत. गावपातळीवर होत असलेल्या या निवडणुका पक्षीय पातळीपेक्षा गावकी, भावकी, भाऊबंदकी यावरच होत असल्या, तरी अनेक दिग्गजांचे भवितव्य नसले तरी वारे कोणत्या दिशेने आहे हे सांगण्यास मोलाची कामगिरी बजावू शकतात.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli district due to gram panchayat election politics is at full swing print politics news amy
First published on: 12-12-2022 at 14:31 IST