ठाणे : ठाणे जिल्ह्यात आणि त्यातही ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईदर या शहरांमध्ये गेल्या दहा वर्षात वाढलेल्या ताकदीचा हवाला देत ठाण्यावर गेल्या महिनाभरापासून दावा करत ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागावर वर्चस्व निर्माण करु पहाणाऱ्या भाजपला जागा वाटपाच्या वाटाघाटीपुरते का होईना रोखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. वाटाघाटीच्या पहिल्या टप्प्यात भाजपने ठाणे किंवा कल्याण यापैकी एक जागा द्या असा आग्रह मुख्यमंत्र्यांपुढे धरला होता. कल्याणवरुन मुख्यमंत्री माघार घेत नाहीत हे लक्षात येताच भाजपने ‘ठाणे’ मागितले. ठाण्यासाठी थेट नवी मुंबईतील प्रभावी नेते गणेश नाईक यांचे नाव पुढे करत भाजपने मुख्यमंत्र्यांची दुहेरी अडचण केली. ठाणे भाजपला द्यायचे आणि तेही नाईकांसाठी या विचारानेच मुख्यमंत्र्यांच्या गोटात अस्वस्थता होती. मात्र सव्वा-दीड महिन्यांच्या वाटाघाटीनंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणे राखलच शिवाय जिल्ह्याच्या शहरी भागात वर्चस्व निर्माण करु पहाणाऱ्या भाजपलाही काही काळ रोखल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरु झाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक आकडी जागांवर बोळवण केली जाईल असे चित्र पद्धतशीरपणे उभे करण्यात आले. हे चित्र निर्माण करण्यात ‘मित्र’ पक्षाचीच कुजबूज आघाडी सक्रिय असल्याचा संशय शिंदे यांच्या निकटवर्तीयांच्या गोटात सातत्याने व्यक्त केला जात होता. त्यानंतरही किमान १५ जागा तरी पदरात पाडून घेऊ असा दावा खुद्द मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र श्रीकांत सातत्याने करत होते. हे दावे प्रतीदावे सुरु असताना भाजपने मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी ठाणे आणि कल्याण लोकसभेची जागा मागितली. गेल्या काही वर्षात ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. इथले आमदारही शिंदेसेनेच्या तुलनेत अधिक आहेत. पुन्हा एकसंघ शिवसेना आता राहीलेली नाही. तसेच सर्वेक्षणाचे दाखले देत भाजपने ठाण्यावरुन मुख्यमंत्र्यांची कोंडी सुरु केली होती. भाजपचे राज्यातील नेते ठाण्यावरुन अडून राहीले आहेत हे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी ‘ठाण्याचे नंतर पाहू, कल्याणविषयी मात्र तडजोड नाही’ अशी भूमीका घेतली. मुख्यमंत्री कल्याणवरुन बधत नाहीत हे लक्षात येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरातून कल्याणसाठी श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ‘श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर करणारे फडणवीस कोण’ अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया शिंदे यांच्या शिवसेनेत दबक्या आवाजात उमटल्याही. विशेष म्हणजे ठाण्यावरुन कोंडी करण्यासाठी फडणवीस यांनी ही खेळी केल्याची चर्चाही मग रंगली.

हेही वाचा : रिक्षाचालक ते टेलर, ‘हे’ आहेत वायएसआर काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक

नाईकांसाठीचा आग्रह मुख्यमंत्र्यांना नकोसा ?

ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा करत असताना भाजपने नवी मुंबईतील पक्षाचे मातब्बर नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव यांच्यासाठी आग्रह धरला. गणेश नाईक हे यापुर्वी १२ वर्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहीले आहेत. ठाणे आणि पालघर जिल्ह्याची खडानखडा त्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचे सुत कधीही जमलेले नाही. नाईक पालकमंत्री असतानाही शिंदे यांनी कधीही त्यांच्यासोबत जुळवून घेतले नव्हते. राज्याचे नगरविकास आणि नंतर मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर शिंदे यांनी नाईकांच्या नवी मुंबईत मुक्त संचार सुरु केला. नवी मुंबई महापालिकेत मुख्यमंत्री म्हणतील तीच पुर्वदिशा असा कारभार सुरु राहीला. त्यामुळे अस्वस्थ नाईकांनी ‘नवी मुंबईचे कारभारी ठरविणारे तुम्ही कोण’ असा आवाज एका सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांना दिला होता. याच नाईकांची उमेदवारी भाजपकडून सर्वेक्षणाचा हवाला देऊन पुढे आणली जात नसताना मुख्यमंत्री अस्वस्थ झाल्याचे सांगितले जाते. ठाणे सोडले तर माझ्या राजकारणाच्या पायालाच धक्का बसेल हे मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या दिल्लीश्वरांना पटवून दिले.

हेही वाचा : “सूरतमध्ये जे झालं ते फारच वाईट, पण काँग्रेस डबघाईला आल्यास काय करणार?” विजय रुपाणींचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांचा युक्तीवाद

‘आनंद दिघे यांनी भाजपकडून ठाणे खेचून आणले होते. मी ते भाजपला परत दिले हे शिवसैनिकांना पटणार नाही. तसेच नाईकांना पाडण्यासाठी दिघेंनी कंबर कसली होती. त्याच नाईकांच्या विजयासाठी मी दारोदारी फिरणे संयुक्तीक ठरणार नाही’ असा युक्तीवाद मुख्यमंत्र्यांनी भाजप श्रेष्ठींपुढे केल्याचे सांगितले जाते. संजीव नाईक आणि शिवसैनिकांचे जमणे कठीण आहे. त्यामुळे ठाण्यातील आपल्या गडातच शिंदेसेनेसोबत आलेले अनेक कार्यकर्ते दुसरीकडे मते फिरवतील अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. अखेर मुख्यमंत्र्यांचा हा युक्तीवाद मान्य केला गेला आणि भाजप तसेच नाईकांना ठाण्यात येण्यापासून रोखण्यात त्यांना यश मिळाल्याचे सांगितले जाते.