आम आदमी पार्टी अर्थात आप पक्षाचे नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्लीमधील कथित मद्या घोटाळ्याप्रकरणी अटक झाल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मोदी सरकारकडून केंद्रीय संस्थांचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. या संस्थांच्या माध्यमातून विरोधकांना संपवले जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. असे असतानाच मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

हेही वाचा >> कोल्हापूर दौऱ्यात संजय राऊत यांच्याकडून महाविकास आघाडीतील ऐक्यावर भर

नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी- विजयन

मनिष सिसोदिया यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर प्रमुख विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय संस्थांचा गैरवापर केला जात आहे. यातून देशाची लोकशाहीकडून निरंकूश हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे, असे यातून स्पष्ट होते; अशा भावना विरोधकांनी व्यक्त केल्या आहेत. असे असतानाच पिनराई यांनीदेखील मोदी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय संस्थांचा गैरवापर होत आहे, असा समज सर्वदूर पसरला आहे. मोदी यांनी समोर येऊ हा समज दूर करावा, अशी मागणी विजयन यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

हेही वाचा >> ‘देशातील सर्वात भ्रष्ट सरकार’ अशी टीका करणारा भाजप संगमांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये सहभागी

अरविंद केजरीवाल यांनी मानले विजयन यांचे आभार

‘सिसोदिया यांच्या अटकेनंतर देशभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. याच नाराजीकडे मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहिले आहे,’ असे विजयन म्हणाले आहेत. ‘सिसोदिया हे एक लोकप्रतिनधी आहेत. चौकशीमध्ये अडथळा निर्माण होत असेल, तेव्हा त्यांना अटक करता आले असते. मात्र सध्या त्यांना अटक करणे अयोग्य होते,’ असे मत विजयन यांनी आपल्या पत्रात व्यक्त केले आहे. या पत्रानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजयन यांचे आभार मानले आहेत. देशभारतील नेत्यांवर अटकेची कारवाई केली जात आहे. याविरोधात तुम्ही आजाव उठवला आहे, त्यामुळे तुमचे आभार; असे अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

… हा समज दूर होणे गरजेचे- विजयन

पिनराई विजयन यांनी विरोधकांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्राचाही उल्लेख केला आहे. ‘कायदा त्याचे काम करत आहे. मात्र सिसोदिया यांच्यावर राजकीय हेतू समोर ठेवून कारवाई केली जात आहे, हा समज दूर होणे गरजेचे आहे. विरोधकांनी लिहिलेल्या पत्रातूनही तसेच प्रतित होत आहे,’ अशा भावना विजयन यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >> पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला मोठा धक्का, पोटनिवडणुकीत पराभव; ममता बॅनर्जींवर मुस्लीम मतदार नाराज?

प्रमुख विरोधी पक्षांनीही लिहिले मोदी यांना पत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पिनराई विजयन यांच्याआधी देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. केंद्र सरकारकडून केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग केला जात आहे. राजकीय हेतू समोर ठेवून विरोधकांवर कारवाया केल्या जात आहेत, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तसेच देशातील प्रमुख नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.