२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बऱ्याच कुटुंबांमध्ये राजकीय लढाई होताना दिसत आहे. केरळमध्ये देशाचे माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी आपला मुलगा अनिल अँटनी याला निवडणुकीत पराभूत होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटनी यांनी आपल्या मुलाविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. माझ्या मुलाला निवडणुकीत पराभूत करणे गरजेचे असल्याचे अँटनी म्हणाले आहेत. अनिल अँटनी हे केरळच्या पठाणमथिट्टा लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. वडील ए. के. अँटनी यांनी आता मुलाच्या पराभवासाठी प्रार्थना केली आहे. अँटनी आपल्या मुलाच्या विरोधात प्रचार करीत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा मुलगा आणि भाजपाचे उमेदवार अनिल अँटनी केरळची जागा गमावतील, अशी आशा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना अँटोनी म्हणाले की, त्यांच्या मुलाचा पक्ष हरला पाहिजे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी, दक्षिण केरळ मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अँटो अँटोनी जिंकले पाहिजेत. काँग्रेस नेत्यांच्या मुलांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचे कृत्य चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. “काँग्रेस हा माझा धर्म आहे”, असंही अँटनी यांनी सांगितले आहे. काँग्रेसप्रति निष्ठा व्यक्त करत काँग्रेस हाच माझा धर्म असून, माझी राजकीय कारकीर्द काँग्रेसपासून सुरू झाली होती आणि ती पुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंडिया आघाडी दिवसेंदिवस वाढत असून, भाजपा रसातळाला जात आहे. त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करायची संधी आहे, असाही आशावाद अँटनी यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचाः नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !

भाजपाला पठाणमथिट्टा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागेल. याशिवाय काँग्रेस नेत्याने राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावरही हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांना कोणी गांभीर्याने घेईल, असे मला वाटत नाही. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी नरेंद्र मोदींविरोधात लढत आहेत, असंही अँटनी म्हणाले आहेत. सर्व २० जागांवर यूडीएफ म्हणजेच काँग्रेस आघाडीला विजय मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत सबरीमालामुळे भाजपाला काही मते मिळाली होती. सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहतील, असा दावा अँटनी यांनी केला आहे. वायनाडमधून निवडणूक लढवल्याबद्दल विजयन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती आणि राहुल यांनी उत्तर भारतात भाजपाविरोधात जोरदार लढा द्यावा, असे म्हटले होते. केरळमध्ये गेल्या काही वर्षांत मतांच्या टक्केवारीनुसार भाजपाचा जनाधार वाढला आहे. त्यामुळे पक्षाला येथे जागांच्या बाबतीत खाते उघडण्याची आशा आहे.

हेही वाचाः महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली

भाजपा आणि काँग्रेस केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्डाला लक्ष्य करीत असल्याचा आरोपही केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केला होता. काँग्रेस केंद्रीय तपास यंत्रणांसाठी एजंट म्हणून काम करत आहे, ज्यांनी राजकीय हेतूने केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्ड (KIIB) विरुद्ध चौकशी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या वादग्रस्त चित्रपटावरूनही RSS वर आणखी एक हल्ला चढवला. तसेच राज्याचा अवमान करण्याच्या भगव्या संघटनेच्या अजेंड्याचा एक भाग असल्याचाही आरोप केला. काही लोकांच्या संकल्पनेतून खोटी माहिती देऊन राज्याची प्रतिमा मलिन करण्यासाठीच अशा चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले.