गडचिरोली : सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता. यात गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभेत काँग्रेसला मोठी आघाडी होती. आरमोरी आणि गडचिरोलीत भाजपचे आमदार असतानाही काँग्रेसला मिळालेले मताधिक्य लक्षणीय होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपपुढे लोकसभेतील पिछाडी दूर करण्याचे आव्हान आहे.

गडचिरोलीतील तिन्ही विधानसभेत महायुतीचे वर्चस्व आहे. यातील आरमोरी आणि गडचिरोलीत भाजप तर अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत तिन्ही विधानसभेत भाजपला फटका बसला. काँग्रेसला आरमोरी विधानसभेत त ३२ हजार, गडचिरोलीत २२ हजार आणि अहेरीत १२ हजारावर मताधिक्य मिळाले होते. यापैकी गडचिरोलीत विद्यामान आमदार डॉ. देवराव होळी यांना डावलून भाजपने डॉ. मिलिंद नरोटे या तरुण उमेदवाराला संधी दिली. मात्र, सर्वाधिक फटका बसलेल्या आरमोरीत विद्यामान आमदार कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा कायम ठेवले. गेल्या पाच दशकापासून जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे सर्वेसर्वा असलेल्या पोरेड्डीवार परिवाराचे आरमोरी विधानसभेवर वर्चस्व आहे. येथे आजपर्यंत त्यांच्या मर्जीतील व्यक्तीच आमदार म्हणून निवडून आली आहे. परंतु येथून लोकसभेत भाजपला मोठी पिछाडी होती. त्यामुळे यंदा उमेदवार बदलणार अशी चर्चा होती. पण तसे झाले नाही. पोरेड्डीवार परिवार आणि पक्षाच्या पाठबळाव्यतिरिक्त कृष्णा गजबे यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. उलट लोकसभेत प्रचारादरम्यान त्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. ‘लोडशेडींग’मुळे त्रस्त सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले होते. अशा परिस्थितीत काँग्रेसनेही त्यांच्या विरोधात नवा चेहरा दिला आहे.
गडचिरोलीच्या राजकीय इतिहासात सलग तीनवेळा आमदार म्हणून कुणीच निवडून आलेले नाही. त्यामुळे गजबे यांच्यासमोर यंदा मोठे आव्हान राहणार आहे.

हे ही वाचा… लोकसभेतील मताधिक्य कायम राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान, भाजपला चिंता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप बंडखोरांना अभय

बुधवारी भाजपणे बंडखोरांवर कारवाई केली. पण यात गडचिरोलीचा समावेश नव्हता. अहेरी विधानसभेत अम्ब्रीशराव आत्राम यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीत खदखद आहे. अहेरीत भाजप विरोधात गेल्यास जिल्ह्यातील उर्वरित दोन विधानसभेत अजित पवार गट भाजपला सहकार्य करणार नाही. अशी भूमिका जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजप आता काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.