पुणे : मराठवाडा आणि विदर्भात फटका बसण्याच्या धास्तीने एकीकडे महायुतीने पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात ती कसर भरून काढण्यासाठी व्यूहरचनात्मक पद्धतीने प्रचार केला, तर महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत मिळवलेले यश टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने प्रतिक्रियावादी प्रचार न करता, सद्या सरकारचे काय चुकते आहे आणि त्यावर आमचे उपाय काय, हे दाखवून देण्यावर भर दिल्याचे दिसले.

पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे पक्ष जास्तीत जास्त जागा लढवत आहेत. शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे) हे पक्ष सर्वांत कमी, तर काँग्रेस प्रामुख्याने त्यांच्या बालेकिल्ल्यांत लढत असल्याचे चित्र आहे. प्रचाराच्या वेळी शहरी आणि ग्रामीण हा फरक प्रकर्षाने दिसून आला.

हेही वाचा : मराठवाडा : आरक्षण, जरांगे आणि नातीगोती

अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेत त्यांनी राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच पुण्याचा विकास, मेट्रो, उच्च वर्तुळाकार मार्ग, प्राप्तिकरातील सवलत अशा खास मध्यमवर्गीय मुद्द्यांना हात घालून त्याला आपल्या भाषणात आवर्जून स्थान दिल्याचे दिसले. नितीन गडकरींनीही विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणावर आरोप केले, तर देवेंद्र फडणवीसांनी विशेषत: ‘कसब्या’त ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’वर भर दिल्याचे जाणवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात एकाही ठिकाणी उमेदवार नसताना सभा घेणे, अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या हडपसर आणि वडगाव शेरीतील उमेदवारांसाठी जोर लावणे यातून महायुतीने नियोजनपूर्वक प्रचार केल्याचे दिसून आले.

महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी जिल्हा ढवळून काढला. विशेषत: जेथे अजित पवारांचे उमेदवार आहेत, तेथे त्यांनी साखर कारखाने, शेती आदी स्थानिक मुद्दे केंद्रस्थानी ठेवले. मात्र, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे शहर-जिल्ह्यात उमेदवार असूनही न फिरकणे अनाकलनीय ठरले. काँग्रेसने सर्व भर हा महायुतीचे विकासाचे मुद्दे खोडून काढण्यावर ठेवला. त्यासाठी त्यांची राष्ट्रीय प्रवक्त्यांची कुमक शहरात पाठविण्यात आली होती.

हेही वाचा : विदर्भ: ‘कटेंगे’ ते सोयाबीनपर्यंत प्रचाराची धार

साखर आणि लाडकी बहीण

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरमधील विधानसभेचा यंदाचा प्रचार रखडलेले विकासाचे प्रश्न, साखर उद्याोगातील गैरव्यवहार आणि लाडकी बहीण याभोवती फिरला. साखरेच्या या पट्ट्यात अनेक साखर कारखान्यांची उसाची देयके थकलेली आहेत, काही कारखाने गैरव्यवहारांमुळे बंद पडले आहेत. हे मुद्देदेखील त्या-त्या मतदारसंघात प्रचाराच्या केंद्रस्थानी आले. सध्या लोकप्रिय बनलेल्या ‘लाडकी बहीण’चा मुद्दा सत्ताधाऱ्यांकडून गाजवला जात असताना विरोधकांकडून महिलांवरील अत्याचाराचे मुद्दे पुढे करण्यात आले.

प्रमुख लढती

अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार (बारामती), ● रोहित पवार विरुद्ध राम शिंदे (कर्जत जामखेड), ● रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासणे (कसबा), ● हर्षवर्धन पाटील वि. दत्तात्रय भरणे वि. प्रवीण माने (इंदापूर), ● रोहित पाटील वि. संजयकाका पाटील (तासगाव), ● महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे (कोरेगाव), ● पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले (कराड दक्षिण), ● सुधीर गाडगीळ वि. जयश्री पाटील वि. पृथ्वीराज पाटील (सांगली), ● राजेश लाटकर वि. राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर)

हेही वाचा : धारावीच्या भोवतीच प्रचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाणी आणि अश्लाघ्य आरोप

राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात या दोघांनी परस्परांच्या मतदारसंघात जाऊन एकमेकांची दहशत, दडपशाही संपवण्याची भाषा केली. कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे यांच्याकडून रोहित पवार यांच्याविरोधात भूमिपुत्र विरुद्ध राजपुत्र अशी लढाई असल्याचा उल्लेख केला गेला. भाजपचे पाशा पटेल यांनी जामखेड येथील प्रचार सभेत अश्लील हावभाव केल्याने राष्ट्रवादीच्या (शरद पवार) महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केले.