छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीबरोबरची युती तुटल्यानंतर दलित मतदान वजा होईल या भीतीने ‘एमआयएम’चा प्रचाररंग ग्रामीण भागात भगवा होत जातो, तर शहरात त्याला हिरवा साज चढतो. वजा होणारी मते हिंदू असावीत, या प्रयत्नांना सुरुवात झाल्यानंतर जलील यांचा उमेदवारी अर्ज भरताना अनेकांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या. त्यावर ‘एमआयएम’ पक्षाची पतंग ही निशाणी रंगविण्यात आली आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ॲड. असदोद्दीन ओवेसी यांच्या सभा झाल्या आहेत. पण नेहमीप्रमाणे अकबरोद्दीन यांच्या नावाची चर्चाही होताना दिसत नाही. अकबरोद्दीन हे आक्रमक नेते मानले जातात. जलील यांनी प्रचाराची रणनीती जशी गर्दी तसा रंग असे केल्याचे दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात झालेल्या दंगलीच्या वेळी राम मंदिरावर मुस्लिम तरुणांनी हल्ला करू नये म्हणून इम्तियाज जलील मंदिरात जाऊन बसले होते. त्यामुळे दंगलीतील हिंसाचार आटोक्यात आल्याचा दावा ते करत आहेत. असदोद्दीन ओवेसी यांनीही ‘एमआयएम’ने कधी दूजाभाव करत नसल्याचे भाषणातून सांगितले होते. पूर्वीची टोकदार प्रतिमा ‘धर्मनिरपेक्ष’ व्हावी असे चित्र राजकीय पटलावर निर्माण केले जात आहे. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील सभेतील छायाचित्रात ग्रामीण भागातील अनेकजण भगवी टोपी घालून जलील यांच्या सभेला उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने लिंबाजी येथील गावकऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांना पैसे मिळवून देण्यासाठी जलील यांनी आंदोलन केले होते. या भागात या पतसंस्थेचे ठेवीदार होते. त्यातील अनेकांचे पैसे बुडले आहेत. त्यातून मार्ग निघावा म्हणून खासदार जलील यांनी प्रयत्न केले होते.’ त्यामुळे अनेक हिंदू त्यांच्या सभेला येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, ही संख्या तशी फार नाही. ग्रामीण भागातील भगवा रुमाल शहरात मतदारांसमोर हिरवा हाेत असल्याचे दिसून येत आहे. जलील यांच्या समर्थकांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या सभेतील गळ्यातील गमछ्याचे रंग हिरवे होत जातात. शहरात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जशी गर्दी बदलत जाईल तसे प्रचाररंग बदलत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – बीजेडीला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाने उचलला ‘ओडिया अस्मिते’चा मुद्दा; निवडणुकीत काय होणार?

हेही वाचा – ‘प्रज्वल रेवण्णा यांच्या कथित सेक्स स्कँडलची कल्पना असती तर त्यांना निवडणूक लढवू दिली नसती’; कर्नाटक भाजपाचा पवित्रा

रंग बदलामागची कारणे कोणती ?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील यांना तीन लाख ८८ हजाार ७८४ मते मिळाली होती. केवळ चार हजार २३४ मतांनी ते निवडून आले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साधारणत: चार लाख १५ हजारच्या घरात मुस्लिमांची संख्या आहे. हे प्रमाण एकूण लोकसंख्येत २१.८ टक्के असल्याचे राजकीय अभ्यास अलिकडच्या काळात करण्यात आले होते. साधारणत: तीन लाख १५ हजार मतदान म्हणजे १६ टक्के मतदान अनुसूचित जाती जमातीचे आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती तुटल्यामुळे वजा होणारे मतदान हिंदू असावे असे प्रयत्न इम्तियाज जलील यांच्यामार्फत केले जात आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ६४ टक्के मतदान झाले होते. हिंदू मतांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असेही विभाजन झाले होते. गेल्या निवडणुकीप्रमाणेच या वेळी मतदानाचे प्रारुप सारखे असू शकते, अशी राजकीय परिस्थिती असल्याने आता एमआयएमचा आक्रमक चेहरा अकबरोद्दीन प्रचारात उतरविला जाण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच बरोबर जशी गर्दी बदलेल तसा ‘एमआयएम’चा प्रचाररंगही बदलू लागला आहे.