ठाणे : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा देत महायुतीच्या सभांमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाकडून अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करुन सोमवारी भाजपला धक्का दिला. या मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे हे आमदार असून सलग तिसऱ्यांदा ते निवडणुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. असे असताना मनसेकडून पानसे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही खळबळ उडाली असून राज यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या गोटात प्रयत्न सुरु झाल्याची चर्चा आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. २०१२ मध्ये निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातून पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तत्कालिन आमदार संजय केळकर यांचा पराभव करत पहिल्यांदा भाजपच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. २०१८ मध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या आधी त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने त्यांना लगेचच या मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली. या निवडणुकीत तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेचे उमेदवारी आणि ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांचा त्यांनी पराभव केला. त्यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातून नजीब मुल्ला हेदेखील डावखरे यांच्याविरुद्ध रिंगणात होते. या तीन ठाणेकर उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत डावखरे यांनी पाच हजारांपेक्षा अधिक मतांनी मोरे यांचा पराभव केला. यानंतर गेले सहा वर्ष निरंजन या मतदारसंघात बांधणी करत आहेत. पदवीधर मतदारांची नोंदणी करणे, कोकण पट्टयातील शिक्षण संस्थांसोबत संपर्क ठेवणे तसेच याच भागातील सर्वपक्षीय नेत्यांच्या संपर्कात राहून निवडणुकीसाठी आवश्यक असलेला संपर्क प्रस्थापित करण्यात निरंजन यांचा हातखंडा राहीला आहे. राज्यातील बदलेल्या राजकीय समिकरणांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची अतिरीक्त मदत यावेळी निरंजन यांनी गृहीत धरल्याने हा मतदारसंघ भाजपसाठी सोपा राहील असे तर्क लढविले जात असताना राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करुन महायुतीच्या गोटात मिठाचा खडा टाकल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

हेही वाचा: पंतप्रधान मोदी मणिपूरला का गेले नाहीत? अमित शाहांनी सांगितले खरे कारण

लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा देत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मनसैनिकांना उतरविले होते. मुंबई, ठाण्यात राज यांच्या पक्षाची रसद महायुतीच्या उमेदवारांमागे उभी करण्यात भाजपला काही प्रमाणात यश आल्याचे दिसले. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेच्या उमेदवारांसाठी मनसेचे अविनाश जाधव, अभिजीत पानसे हे नेते पुर्ण ताकदीने प्रचारात दिसले. ठाण्यात नरेश म्हस्के यांच्या प्रचाराची मोठी जबाबदारी पानसे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. कधी नव्हे ते या काळात टेंभी नाका येथील आनंद मठीत मनसे नेत्यांचा वावर दिसू लागला होता. भाजप, शिवसेना आणि मनसेचे सुत उत्तम जुळले असल्याचे चित्र एकीकडे दिसत असताना सोमवारी कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करत भाजपला धक्का दिला. या मतदारसंघातून पुन्हा निवडणुक लढविण्याची पुर्ण तयारी निरंजन डावखरे यांनी केली आहे. असे असताना महायुतीतील नेत्यांची चर्चा करण्यापुर्वीच राज यांनी येथून पानसे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. सोमवारी सकाळी उमेदवारी जाहीर होताच सायंकाळी नौपाडा येथील पक्षाच्या कार्यालयात अविनात जाधव आणि अभिजीत पानसे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आम्ही कामाला सुरुवात केल्याचे जाहीर केले. दरम्यान पानसे यांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपचे नेते लवकरच राज यांना साकडे घालतील अशी माहिती पक्षाच्या एका नेत्याने लोकसत्ताला दिली. लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत नाही तोच पानसे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आम्हालाही धक्का बसला अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेतील एका नेत्याने लोकसत्ताला दिली. लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत मनसे नेतेही आमच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात होते. त्यामुळे राज यांची भूमीका अचंबित करणारी आहे, असे या नेत्याने सांगितले.