संजीव कुळकर्णी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या अखेरच्या पर्वात महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय पेच निर्माण झालेला असतानाच हैदराबादसह मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात झुंज, पराक्रम आणि बलिदान यादृष्टीने अव्वल ठरलेल्या इस्लापूर पोलीस ठाण्यावरील धाडसी हल्ल्याच्या घटनेच्या अमृत महोत्सवासही गुरुवारी ३० जून रोजी सुरूवात होत आहे!

७५ वर्षांपूर्वीच्या निजामी राजवटीत इस्लापूर हे गाव तेव्हाच्या तेलंगणा विभागातील आदिलाबाद जिल्ह्यात समाविष्ट होते. आता ते मराठवाड्यातील किनवट तालुक्यात असून १९४८ सालच्या ३० जून रोजी या गावातल्या पोलीस ठाण्यावर करण्यात आलेला हल्ला आणि त्यात चार स्वातंत्र्यसैनिकांना प्राप्त झालेली वीरगती ही या गावाची ओळख आजही ठळक असल्याचे तेथील ज्येष्ठ पत्रकार श्यामकांत बोर्डे यांनी नमूद केले.

हैदराबादच्या स्वातंत्र्यसंग्रामात उल्लेखनीय कामगिरीमध्ये नांदेड जिल्हा आणि या जिल्ह्याशी संबंधित उमरखेड केंद्राने मोठे योगदान दिले होते. नांदेड जिल्ह्यातील चळवळ जनतेच्या विलक्षण सामर्थ्याचा एक मोठा भाग झाली होती. इस्लापूर ठाण्यावरील हल्ल्याच्या पाच महिने आधी नांदेड जिल्ह्यातील लढाऊ कार्यकर्त्यांनी ३० जानेवारी १९४८ रोजी उमरीच्या स्टेट बँक ऑफ हैदराबादवरील दरोड्याची योजना यशस्वीपणे फत्ते केली होती.

इस्लापूर ठाण्यावरील हल्ल्याच्या त्या घटनेचे संक्षिप्त वर्णन ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव यांच्या  ‘हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा’ या ग्रंथात उपलब्ध आहे. त्यात त्यांनी प्रारंभीच म्हटले आहे की, ‘उमरी बँक अॅनक्शन अन्य कारणाने प्रसिद्ध पावले खरे, परंतु प्रत्यक्ष झुंज, सामना देण्याची कुवत, पराक्रम आणि बलिदान या दृष्टीतून बघितले तर इस्लापूर ठाण्यावरील हल्ला हे पहिल्या प्रतीचे अॅनक्शन ठरते.’हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामाच्या पर्वात मराठवाड्यात विशेषतः नांदेड परिसरात स्वातंत्र्य आंदोलनाने मोठा जोर धरला होता. खेडे न् खेडे पेटलेले होते; परंतु तेलंगणात असलेला किनवट परिसर शांत होता. चळवळीचे लोण तेथपर्यंत पोचलेले नव्हते. त्यामुळे त्या भागात रझाकारांनी मोठा धुमाकूळ घातला होता. निजामी राजवटीतील पोलिसांच्या जोडीला तीन-चारशे रझाकारांची सेना तैनात होती. त्यातून लोकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जात होते. या पार्श्वभूमीवर अत्याचारांना आळा बसविणे आणि लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, यासाठी इस्लापूर पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याची योजना निश्चित झाली होती.

त्यावेळी इस्लापूर ठाण्यामध्ये शस्त्रास्त्रांचा, बंदुका, रायफलींचा फार मोठा साठा होता. तो हस्तगत करण्यासाठी तेथे हल्ला करण्याची योजना निश्चित झाली. १३५ सैनिकांसह हत्यारे आणण्यासाठी आणखी ४० असे एकूण १७५ जणं या अॅ क्शनमध्ये सहभागी झाले होते. ठरल्याप्रमाणे हे सर्वजण इस्लापूरला पोहोचले; परंतु त्याच दिवशी निजामी लष्कराची एक तुकडी इस्लापूरमध्ये आलेली होती. अशा परिस्थितीत आंदोलक सैनिकांनी ठाण्यावर हल्ला केला; परंतु पोलीस आणि लष्कराने त्याच्यावर गोळीबार केला. त्यात हदगावचे जयवंतराव वायपनेकर, जानकीलाल राठी, तुकाराम कंजारकर आणि लाखसिंग लमाणी या चौघांना वीरगती प्राप्त झाली. आणखी सात जण जखमी झाले. या कारवाईतील एकमेव यश म्हणजे सैनिकांनी १४ रझाकार पकडले आणि त्यांना कंठस्नान घातले.

तरुण वयात हुतात्मा झालेल्या जयवंतराव वायपनेकर यांच्या पत्नी नंतरच्या काळात हैदराबाद राज्यामध्ये  आमदार झाल्या. आता भाजपत असलेल्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्या-माजी केंद्रीयमंत्री  सूर्यकांता पाटील ह्या  जयवंतरावांच्या कन्या होत. जानकीलाल राठी यांचे पुतणे कैलास व डॉ.गोपाल राठी हे नांदेडमध्ये उद्योग व्यवसायात कार्यरत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाही चिरा, नाही पणती

हैदराबादच्या स्वातंत्र्यसंग्रामानंतरही इस्लापूर ठाण्यावरील हल्ल्याच्या घटनेला मोठे मोल प्राप्त झाले. आजही इस्लापूरचे पोलीस ठाणे त्याच जागेमध्ये उभे आहे. नंतरच्या काळात ठाण्याच्या इमारतीच्या भिंती पाडून नव्याने बांधकाम करण्यात आले. मात्र तेथे हुतात्मा झालेल्यांचे कोणतेही स्मारक गेल्या पाऊणशे वर्षांत झाले नाही. हैदराबादच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव येत्या १७ सप्टेंबर रोजी सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून इस्लापूर ठाण्यावरील हल्ल्याच्या घटनेची माहिती संकलित केली जात आहे.