दक्षिण काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ भारताने उद्ध्वस्त केले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष सुरू असताना अचानक शस्त्रविरामाची घोषणा झाली. या निर्णयावर विरोधी पक्षातील नेत्यांनी वारंवार टीका केली. हा निर्णय सर्वपक्षीय बैठक घेऊन व्हायला हवा होता, असे अनेकांनी म्हटले.

शस्त्रविरामाची घोषणा झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधला असता विरोधी पक्षाने केलेले सर्व आरोप खोडून काढले. त्यांनी या मुलाखतीत केंद्राच्या प्रमुख यशस्वी योजना, दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने राबविलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले.

विरोधकांच्या आरोपांबाबत ते काय म्हणाले?

  • लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी ‘नरेंदर सरेंडर’ असा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.
  • केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी प्रत्युत्तर देत म्हटले, ऑपरेशन सिंदूरमधील लक्ष्यांची निवड हा पूर्णपणे लष्करी निर्णय होता. तसेच शस्त्रविरामाचा निर्णयही घेण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.
  • या दोन्ही गोष्टींना राजकीय नेतृत्वाने मान्यता दिली होती, असे पुरी यांनी म्हटले.
  • ते म्हणाले, घरबसल्या टीका करणाऱ्या लोकांकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही.
  • राजकीय नेतृत्वाला निर्णय घेऊ द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी ‘नरेंदर सरेंडर’ असा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

“भारत ४.३ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था”

ते पुढे म्हणाले, “जगभरातील लोक आपल्या परिपक्व राजकारणाचे कौतुक करतात. भारताने २२ मिनिटांत पाकिस्तानच्या नऊ तळांना उद्ध्वस्त केले. ते काय करू शकले? सर्व प्रकारचे ड्रोन आले आणि भारताने त्यांना निष्क्रिय केले. आज भारत ४.३ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे. आपल्या देशांतर्गत संरक्षण उत्पादन वाढत आहे. ब्रह्मोसची जगभरात मागणी आहे आणि त्याचा एक भाग भारतात तयार केला जात आहे. ११ वर्षांच्या सुशासनामुळे, आर्थिक आणि कल्याणकारी योजनांमुळे आणि बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडलेल्या लोकांच्या संख्येने देशात उत्सवाचे वातावरण आहे.”

“विरोधकांच्या चर्चा नको”

पुरी म्हणाले, “देशात गरिबीचा दर २४ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. बेरोजगारीचा दरही कमी झाला आहे. अर्थातच, आपल्याला अनेक अशा गोष्टी करायच्या आहेत. आपण अशा प्रकारच्या चर्चा करणे अपेक्षित आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी ज्या प्रकारच्या चर्चा करत आहेत, त्याकडे लक्ष द्यायला नको.”

“विरोधी पक्षाने त्यांच्या काळात काय केले”

ट्रम्प यांच्या मध्यस्थीवरील मुद्द्याबाबत बोलताना पुरी म्हणाले, “जागतिक नेत्यांनी केलेल्या विधानांचा अर्थ बरेच लोक आपल्यानुसार लावतील आणि मला वाटत नाही की, त्यात मी काही बोलल्यास फरक पडेल. पाकिस्तानशी द्विपक्षीय व्यवहार करण्याचे आमचे धोरण सुसंगत आहे. ऑपरेशन सिंदूर समाप्त झाले नसून ते अद्यापही सुरूच आहे. त्याच्या व्यवस्थापनात परिपक्वतेचा ठसा दिसतो.”

त्यांनी विरोधी पक्षावर आरोप करत म्हटले, “विरोधी पक्षाने त्यांच्या काळात काय केले? २६/११ चा हल्ला झाला तेव्हा मी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पीस अँड सिक्युरिटीचे प्रमुख वॉल्टर चिपमन यांच्या स्वागत कार्यक्रमात जेवत होतो आणि तिथे सध्याचे विरोधी पक्षनेतेदेखील उपस्थित होते. त्यानंतर असे दिसले की ते एका फार्महाऊसमध्ये पार्टीला गेले होते.”

त्यांनी पुढे म्हटले, “मुंबई हल्ल्यानंतर काही कारवाई झाली का? एका माजी परराष्ट्र सचिवाने सांगितले की, त्यांच्याकडे पर्याय नसताना त्यांना संयम बाळगावा लागला. आजचा भारत वेगळा आहे. आम्ही म्हटले आहे की कोणत्याही दहशतवादी कृत्याला युद्ध म्हणून पाहिले जाईल आणि ते स्पष्ट आहे, त्यात धोरणात्मक अस्पष्टतेची गरज नाही. बरेच लोक काय चालले आहे हे पूर्णपणे न समजता विधाने करतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी सरकारची ११ वर्षांतील कामगिरी

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, शासकीय योजना आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. वस्तू व सेवा सर्वत्र समान पद्धतीने वितरित होत असल्याचे चित्र आहे. हे केंद्र सरकारचे सर्वात मोठे यश आहे. त्यांनी पुढे म्हटले, महिलाकेंद्रित विकासाच्या संकल्पनेतून महिलांची नेतृत्व करणाऱ्या विकासाकडे सकारात्मक वाटचाल दिसून येत आहे. महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी स्थान दिले जाते, तेव्हा तो विकास अधिक शाश्वत आणि वेगवान ठरतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.