अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांना झालेली अटक ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी झाली आहे. त्यामुळे त्याचे राजकीय पडसाद उमटतीलच हे निश्चित आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा फायदा नेमका आम आदमी पक्षाला होईल की भाजपाला, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर ‘आप’चे काय होणार?

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जर अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही, तर ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी आपकडे लोकप्रिय चेहरा नसेल. त्याचा परिणाम आपच्या निवडणुकीतील प्रदर्शनावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत पक्षासमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहणार आहे. त्याशिवाय पंजाबसारख्या राज्यातील मतदारही काँग्रेसकडे वळू शकतात आणि याचा परिणाम इंडिया आघाडीवरही होऊ शकतो, असंही काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

हेही वाचा – अटकेविरोधात काँग्रेसचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी, पण पंजाबमध्ये मात्र…

दिल्लीचे राजकारण बदलेल?

मागील १० वर्षांतला दिल्लीच्या निवडणुकांचा इतिहास बघितला, तर येथील मतदारांनी निवडणुकीनुसार विविध पक्षांना मतदान केलं आहे. दिल्लीतील जनतेनं लोकसभेच्या निवडणुकीला भाजपाला, तर विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मतदान केलं आहे.

मागील निवडणुकीच्या आकडेवारीनुसार २०१४ मध्ये भाजपानं ४६.६ टक्के मतांसह दिल्लीतील सर्व जागा जिंकल्या; तर आम आदमी पक्षाला केवळ ३३ टक्के मतं आणि काँग्रेसला १५ टक्के मतं मिळाली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळाला होता. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला ५४.५; तर भाजपाला ३२.३ टक्के मतं मिळाली होती.

२०१९ मध्येही असंच चित्र होतं. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ५७ टक्के मतांसह भाजपानं जवळजवळ सर्वच जागा जिंकल्या. तर, या निवडणुकीत काँग्रेसला २२.५ टक्के आणि आपला १८.१ टक्के मतं मिळाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपनं ५३ टक्के मतांसह ६२ जागा जिंकल्या; तर भाजलाला ३८ टक्के मतांसह केवळ आठ जागा जिंकता आल्या.

हेही वाचा – अरविंद केजरीवालांनंतर आता मुख्यमंत्री भगवंत मान यांचा नंबर? पंजाबमधील मद्य धोरणाच्या चौकशीनंतर ‘आप’मध्ये भितीचे वातावरण

दरम्यान, आता अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आगामी लोकसभा निवडणुकीत आपला फायदा होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते- मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांत दिल्लीतील मतदारांनी राष्ट्रीय मुद्द्यांना महत्त्व देत, भाजपाला मतदान केलं; तर विधानसभेत विकासात्मक मुद्द्यांना महत्त्व देत ते केजरीवाल यांच्या पाठीशी उभे राहिले. मात्र, आता यंदाच्या निडणुकीत राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच केजरीवाल यांच्या अटकेचा मुद्दाही केंद्रस्थानी राहणार आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला सहानुभूती मिळेल, अशी शक्यता आहे.

पंजाबमध्ये ‘आप’ला फायदा होईल?

दिल्लीव्यतिरिक्त पंजाब हे असं एक राज्य आहे, जिथे अरविंद केजरीवालांच्या अटकेचा परिणाम होऊ शकतो. पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा आहेत. तसेच पंजाबमधील शहरी भागात भाजपाची परिस्थिती नाजूक आहे. महत्त्वाचं म्हणजे पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. केजरीवाल यांच्या अटकेनंतर या ठिकाणी एक तर आपला सहानुभूती मिळू शकते किंवा येथील मते काँग्रेसकडे वळू शकतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये आपला ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळाला होता.

इंडिया आघाडीची भूमिका काय?

केजरीवालांच्या अटकेनंतर इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ईडीने ताब्यात घेताच लगेचच राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, एम. के. स्टॅलिन, पिनाराई विजयन व अखिलेश यादव या विरोधी नेत्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली. तसेच ममता बॅनर्जी यांनी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना फोन करून धीर देण्याचा प्रयत्न केला.