महेश सरलष्कर

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढलेल्या देशव्यापी ‘भारत जोडो यात्रे’ला महाराष्ट्राव्यतिरिक्त सर्वाधिक प्रतिसाद कर्नाटकमध्ये मिळाला होता. या यात्रेचे निवडणुकीच्या मतांमध्ये परिवर्तन होणार का हा प्रश्न विचारला जात होता. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाने निदान एका राज्यात तरी या यात्रेला यश आल्याचे दिसत आहे.

राहुल गांधी व प्रियंका गांधी-वाड्रा यांनी प्रचारसभा आणि रोड शो करून दीड-दोन महिने राज्य पिंजून काढले होते. राहुल गांधी यांनी २२ तर प्रियंका गांधी-वाड्रा यांनी २७ प्रचारसभा व रोड शो केले. राहुल गांधींनी प्रचार केलेल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे यशाचे प्रमाण ६५ हक्क्यांहून अधिक राहिलेले दिसते तर, प्रियंकांनी प्रचार केला, तिथे पक्षासाठी विजयाचे प्रमाण सुमारे ५० टक्के राहिले आहे.

आणखी वाचा-जुन्या व स्थानिक निष्ठावंत नेत्यांना डावलल्याचा भाजपला फटका?; महाराष्ट्रासाठीही भाजपला हा सूचक इशारा

राहुल गांधी यांनी बहुचर्चित कोलारमधून प्रचाराचा शुभारंभ केला होता व एखाद-दोन सभांमध्ये त्यांनी अदानी प्रकरणासारख्या राष्ट्रीय मुद्द्यांचा उल्लेख केला होता. मात्र, भाजपला फायदा होईल अशा कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यांवर काँग्रेसच्या दिल्लीतून आलेल्या नेत्यांनी बोलू नये, अशी विनंती स्थानिक नेत्यांनी केली होती. सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार तसेच, प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्या निवडणूक रणनिती आखणाऱ्या चमूने फक्त स्थानिक मुद्द्यांवरच प्रचार केला पाहिजे, ही बाब राहुल व प्रियंका यांना समजून सांगितली होती. त्यानंतर राहुल वा प्रियंका यांनी एकदाही राष्ट्रीय मुद्द्यांचा उल्लेख भाषणांमध्ये केलेला दिसला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात उतरेपर्यंत राहुल वा प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यापैकी कुणीही मोदींवर भाष्य केले नाही. राहुल गांधींनी कर्नाटकमधील भाजप सरकार ४० टक्के कमिशनवाली सरकार असल्याच्या मुद्द्यावर प्रचारात भर दिला होता. याशिवाय, महागाई, गॅस सिलिंडरचे भडकलेले दर, बेरोजगारी, दलित-मुस्लिमांचे आरक्षण आदी मुद्दे उपस्थित केले. एकप्रकारे राहुल गांधींनी स्थानिक नेत्यांच्या सल्लानुसार प्रचाराची दिशा निश्चित केली व अखेरपर्यंत ती कायम ठेवली.

आणखी वाचा- Karnataka Election : काँग्रेसची आघाडीकडे वाटचाल! पण मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावरून काँग्रेसची डोकेदुखी कायम

२०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच निवडणूक प्रचारात झोकून दिल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम बंगाल, बिहार व उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचार केला असला तरी तिथे काँग्रेस कमकुवत आहे. गुजरातमध्ये त्यांनी फक्त दोन सभा घेतल्या, हिमाचल प्रदेशमध्ये ते प्रचारालाही गेले नव्हते. कर्नाटकमध्ये सहा महिन्यांपूर्वी ‘भारत जोडो’ यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तिथली पावसातील सभाही गाजली होती. राहुल गांधींच्या सभांना गर्दी झाल्याचे दिसल्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत अनुकूल वातावरण असल्याचे काँग्रेसचे नेते सांगत होते. त्यामुळेही राहुल गांधींनी अधिकाधिक प्रचार केल्याचे सांगितले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसने गुजरातमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केल्याचे सांगितले होते. पण, थेट लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम खऱ्या अर्थाने काँग्रेसने कर्नाटकमध्ये केले. बेंगळुरूमध्ये महिला प्रवाशांसोबत राहुल गांधींनी बसमधून केलेला प्रवास, रोड शोमधून स्थानिकांशी केलेला संवाद या रणनितीचा मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी काँग्रेसला फायदा झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या कर्नाटकमधील विजयामध्ये महिलांचा कौल महत्त्वाचा ठरला असून प्रियंका गांधी-वाड्रा यांनी प्रचारसभांमध्ये महिला मतदारांना आकर्षित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसले. त्या डोसे बनवताना दिसल्या, महिलांशी वैयक्तिक संवाद साधताना काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनाचा प्रमुख्याने त्यांनी उल्लेख केला. कर्नाटकमधील गृहिणींना दरमहा दोन हजार रुपयांचा भत्ता देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. प्रियंका गांधी-वाड्रा यांनी हाच मुद्दा प्रचाराच्या अग्रभागी ठेवला होता!