RCB Victory Parade Stampede in Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल १८ वर्षांनी आयपीएलचा चषक उंचावला आहे. यानिमित्त आरसीबीचं होम ग्राऊंड असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाचा विजयी जल्लोष अनुभवण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. त्याचवेळी चेंगराचेंगरी होऊन ११ जण दगावले, तर ४७ जण जखमी झाले आहेत. या चेंगराचेंगरीची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावरही चर्चा होताना दिसत आहे. ती म्हणजे बंगळुरू आणि मुंबईतल्या गर्दी व्यवस्थापनाची तुलना. भारतीय क्रिकेट संघाच्या २०२४ च्या विश्वचषक उत्सवाची तुलना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल विजय परेडदरम्यान बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीशी केली जात आहे. या संदर्भात अनेक वापरकर्त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, टीम इंडियाच्या विश्वचषक उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने गर्दी करणाऱ्या मुंबईने अशी दुर्घटना होण्यापासून कशी टाळली.

“आज मला जाणवले की, मुंबईने बंगळुरूपेक्षा दहापट जास्त गर्दी हाताळली आणि एकही निष्पाप जीव दगावला नाही. आपण सर्वांनी आयुष्याची किंमत ओळखली पाहिजे. कोणत्याही खेळाचा जल्लोष साजरा करणं आपल्या जीवापेक्षा मोठं नाही”, असे एका वापरकर्त्याने पोस्ट करत मुंबई पोलिसांना सलाम आणि हात जोडून इमोजीसह टॅग केले आहे.

दुसऱ्या वापरकर्त्याने हीच भावना व्यक्त केली आणि यावर प्रश्न विचारला की, “मुंबईने पाच वेळा कोणताही अपघात न होता उत्सव कसा साजरा केला? तर बंगळुरू एकही अपघात सहन करू शकला नाही?” या पोस्टमध्ये कर्नाटक काँग्रेस सरकार, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना चेंगराचेंगरीसाठी जबाबदार धरले आहे आणि हे प्रशासनाचे पूर्णपणे अपयश असल्याचे म्हटले आहे.

आणखी एका वापरकर्त्याने अधिक तीव्र टीका केली आणि म्हटले की, “एका स्पर्धेसाठी इतक्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल जनतेलाही तितकेच दोषी ठरवले पाहिजे. ही कोणतीही ऑलिम्पिक किंवा राष्ट्रीय कामगिरी नव्हती, फक्त एक फ्रँचायझी लीग होती जिथे खेळाडू, मालक आणि सट्टेबाज करोडो कमावतात.”

दुसऱ्या एका पोस्टमध्ये सामाजिक निराशेचा व्यापक संबंध अधोरेखित केला गेला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, “मुंबईतील जल्लोषात बेरोजगारीने भूमिका बजावली असली तरी बंगळुरूतील दुःखद चेंगराचेंगरीमुळे अनेकांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जीवितहानी होऊनही कोणीही जबाबदारी घेण्यासाठी पुढे आलेले नाही.”

ऑनलाइन अशाप्रकारे संताप व्यक्त केला जात असताना भाजपानेही राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी पुरेशी पोलिस फौज किंवा नियोजन न करता घाईघाईने कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप केला आहे.
कर्नाटक भाजपाचे प्रमुख बी. वाय. विजयेंद्र यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “या कार्यक्रमात पुरेशी तयारी आणि पोलिस सुरक्षेचा अभाव होता. राज्य सरकारने कोणतीही तयारी न करता हे आयोजन करायला नको होते. जर तुम्ही मुंबईत विश्वचषक उत्सव पाहिला असेल तर तो योग्य व्यवस्थेसह नियोजित होता. मॅच झाल्याच्या रात्री बंगळुरूमध्ये लाखो लोकांनी उत्सव साजरा केला. इतक्या लवकर आणि तयारीशिवाय दुसरा कार्यक्रम का आयोजित करायचा?”

कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनीही इतर भारतीय शहरांशी तुलना करत टीकेचा सूर कायम ठेवला. “हे खूप दुःखद आहे. मुंबई आणि कोलकातासारख्या शहरांनीही त्यांच्या संघांचे विजय साजरे केले, पण बंगळुरूमध्ये हे काय पाहावे लागले?”

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ११ मृत्यू आणि ३३ जखमी झाल्याचे सांगितले आहे. “दोन ते तीन लाखांहून अधिक लोक आले होते, कोणालाही इतक्या गर्दीची अपेक्षा नव्हती,” असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी दंडाधिकारी चौकशी आणि मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, “यावेळी जमलेली गर्दी सुरक्षेवर वरचढ झाली. त्यांनी दरवाजे तोडले. खूप चेंगराचेंगरी झाली. अति गर्दी आणि पावसामुळे आम्ही विमानतळावरून आणि विधान सौधा इथून मिरवणूक रद्द केली. स्टेडियममध्येही आम्ही आयोजकांना दहा ते पंधरा मिनिटांत कार्यक्रम संपविण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमस्थळाची क्षमता ३५ हजार लोकांएवढी होती, मात्र तिथे दोन लाखांहून अधिक लोक उपस्थित होते.”

गेल्या वर्षीची ‘टीम इंडिया’ची परेड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई पोलिसांनी ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याप्रमाणे आपली भूमिका चोख बजावली होती. यावेळी जवळपास तीन लाख लोक या ठिकाणी जमले होते. टीम इंडियाचा विजयोत्सव मुंबई पोलिसांनी कुठलेही गालबोट न लागता यशस्वी करून दाखवला. टीम इंडियाचे सर्वांनीच कौतुकं केलं, मात्र समोर उसळलेला जनसागर आणि त्यात पोलिसांची भूमिका पाहून विश्वविजेत्यांनीदेखील पोलिसांचेच आभार मानले होते. भारतीय संघाची विजयी यात्रा यशस्वी करण्यासाठी ८०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जमलेली गर्दी लक्षात घेता बसच्या बाजूला १०० पोलिस जवानांचे वर्तुळ पोलिसांनी उभे केले होते. तसेच प्रत्येक चौकात १०० हून अधिक पोलिस, वाहतूक पोलिसही तैनात होते. या शिवाय राज्य राखीव पोलिस दल, केंद्रीय सुरक्षा बलाचे जवानही बंदोबस्तासाठी होते. प्रत्येक रस्त्याच्या एक्झिट पॉईंटला रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती, जेणेकरून कुणाला त्रास झाला तर तात्काळ त्याला रुग्णालयात नेण्यात येईल. याशिवाय वानखेडे स्टेडियमच्या आतही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईतल्या या परेडमध्येही गर्दीत ५० ते ६० जणांना श्वसनाचा त्रास झाला, मात्र त्यांना वेळीच उपचार मिळाले. १० ते १२ अल्पवयीन बेपत्ता मुलांना पोलिसांनी त्यांच्या पालकांकडे सुखरुप पोहोचवले. मरीन ड्राइव्ह परिसरातून शेवटचा नागरिक सुखरुप बाहेर पडेपर्यंत पोलिस कर्तव्यदक्षपणे आपली भूमिका बजावत होते