राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पुत्र व बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे वादात अडकले आहेत. हा वाद एका सोशल मीडिया पोस्टवरून सुरू झाला, ज्यानंतर त्यांना पक्षातून आणि कुटुंबातून सहा वर्षांसाठी काढून टाकण्यात आले. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये तेज प्रताप यादव यांनी दावा केला की, ते १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांच्या कृतीला बेजबाबदार वर्तन म्हटले.

या प्रकरणानंतर तेज प्रताप यादव यांच्या पत्नी ऐश्वर्या राय यांनी यादव कुटुंबावर टीका केली आणि बिहारमधील निवडणुकीपूर्वी हे सर्व नाटक रचत असल्याचा आरोप केला. त्यांनी प्रश्न केला की, “माझे आयुष्य का उद्ध्वस्त झाले? मला का मारहाण करण्यात आली?” ऐश्वर्या राय नक्की कोण आहेत आणि तेज प्रताप यांच्याशी लग्नादरम्यान काय घडले होते? तेज प्रताप यांच्या सोशल मीडिया पोस्टवर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? जाणून घेऊयात.

ऐश्वर्या राय कोण आहेत?

ऐश्वर्या राय या बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांच्या नात आहेत आणि सहा वेळा आमदार आणि माजी मंत्री राहिलेले चंद्रिका राय यांच्या लेक आहेत. त्यांचे आजोबा दरोगा प्रसाद राय १९७० मध्ये काही काळासाठी बिहारचे मुख्यमंत्री होते. ऐश्वर्या दिल्ली विद्यापीठातून पदवीधर झाल्या आणि त्यांनी एमबीएची पदवी प्राप्त केली. २०१८ मध्ये त्यांनी पाटणा येथे आयोजित एका भव्य समारंभात तेज प्रताप यादव यांच्याशी लग्न केले. परंतु, हे लग्न फार काळ टिकले नाही.

काही महिन्यांतच ऐश्वर्या तेज प्रताप यांच्या घरातून निघून आल्या. ऐश्वर्या यांनी तेज प्रताप व त्यांच्या कुटुंबावर गैरवर्तनाचा आरोप केला. दोन्ही कुटुंबांमधील वाद लवकरच चव्हाट्यावर आला. तेज प्रताप यांच्या घरातून बाहेर पडताना ऐश्वर्या रडताना दिसल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, लग्नादरम्यान त्यांच्याशी गैरवर्तन झाले. यादरम्यान त्यांनी यादव कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले. त्यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी, तेज प्रताप यांची बहीण आणि खासदार मीसा भारती आणि तेज प्रताप यांच्यावर अनेक आरोप केले.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी छळ आणि मारहाणीचा आरोप करत पोलिस तक्रारदेखील दाखल केली होती. राबडी देवींनीही ऐश्वर्यावर त्रास देण्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे तेज प्रताप यांनीदेखील ऐश्वर्यावर त्रास दिल्याचा आरोप केला होता. तेज प्रताप या प्रकरणावर बोलताना म्हणाले होते की, दोघे एकमेकांसाठी योग्य नव्हतो. ते म्हणाले होते, “मी उत्तर ध्रुव आहे आणि ती दक्षिण ध्रुव आहे. माझ्या पालकांसमोर माझ्या आणि माझ्या पत्नीमध्ये भांडणे झाली आहेत. मला आता तिच्याबरोबर राहायचे नाही, दुःखी आणि तणावात राहण्यात काही अर्थ नाही,” असे ते म्हणाले.

या प्रकरणानंतर दोन्ही कुटुंबांमधील राजकीय संबंधही तुटले. २०१८ च्या लग्नामुळे दोन्ही कुटुंबे आणखी जवळ आली होती. ऐश्वर्याचे वडील चंद्रिका राय यांनी काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू केली होती, पण नंतर ते आरजेडीमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांची लालू प्रसाद यादव यांच्याशी जवळीक वाढली. परंतु, ऐश्वर्यावर झालेल्या आरोपांनंतर चंद्रिका राय यांनी आरजेडी सोडली आणि ते नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये सामील झाल्या. सध्या ऐश्वर्या आणि तेज प्रताप यांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.

तेज प्रताप वादावर ऐश्वर्या राय यांचे आरोप

तेज प्रताप यादव यांच्या एका तरुणीबरोबरच्या संबंधांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर ऐश्वर्या राय यांनी यादव कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. तेज प्रताप यांना त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांनी आरजेडी आणि कुटुंबातून सहा वर्षांसाठी काढून टाकल्याच्या वृत्तावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, हा फक्त लोकांना दिशाभूल करण्यासाठीचा एक कार्यक्रम होता.

त्यांनी एएनआयशी बोलताना म्हटले, “सर्वांना माहिती आहे की काय घडले. जर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला सर्व गोष्टी माहीत होत्या, तर त्यांनी त्यांचे लग्न माझ्याशी का लावले? माझे आयुष्य का उद्ध्वस्त झाले? मला मारहाण का झाली? आता त्यांना अचानक सामाजिक जागृती झाली आहे. मला माझ्या घटस्फोटाची माहिती मीडियाकडून मिळाली. मला मिळालेली सर्व माहिती मीडियाद्वारे होती. मला माहीत नव्हते की काय चालले आहे,” असे त्या म्हणाल्या. बिहार निवडणुका जवळ येत असल्याने तेज प्रताप यांना बाहेर काढण्याच्या संपूर्ण घटनेमागे कदाचित त्यांचा हात असावा, असे म्हणत त्यांनी राबडी देवींवरही आरोप केले. ऐश्वर्या यांनी प्रश्न केला की, जेव्हा त्यांच्यावर अत्याचार होत होते तेव्हा कुटुंबातील कोणीही आधी का बोलले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐश्वर्या यांनी म्हटले, “राबडी देवी काल गेल्या असाव्यात आणि त्यांना सध्या गप्प राहण्यास सांगितले असावे. कारण हा निवडणुकीचा काळ आहे, म्हणूनच ते हे नाटक करत आहेत,” असे त्या म्हणाल्या. ऐश्वर्या यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर, त्यांच्या मुलावर कारवाई करण्याचे नाटक करून राजकीय नाटक रचल्याचा आरोप केला. त्यांनी आपण कायदेशीर लढाई सुरू ठेवू असेही सांगितले. त्यांनी म्हटले, “आता हे उघड झाले आहे, त्यांचे १२ वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत आणि महिलेला दोष देणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. मला न्याय कधी मिळेल? मी माझा लढा सुरू ठेवेन,” असे त्या म्हणाल्या.