महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने १२४ उमेदवारांची यादी जाहीर करून बंडखोरी कितपत होऊ शकेल याची चाचपणी करून पाहिली होती. आता उमेदवारांची पुढील यादी काळजीपूर्वक तयार करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ‘कर्नाटक आम्हीच जिंकू’, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

निवडणूकपूर्व चाचणीतील अंदाजात कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही निवडणूक कितपत सोपी वा अवघड आहे?

खरगे – कुठल्याही निवडणुकीत बेसावध राहणे योग्य नसते. आमचे नेते नेटाने मतदारसंघांमध्ये काम करत आहेत, कार्यकर्ते मेहनत करत आहेत. शिवाय, लोकांच्या मनात भाजप सरकारबद्दल राग आहे. गेल्या वेळी भाजपने काँग्रेस आणि जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) आमदार फोडले. त्यांना पुन्हा निवडणूक आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. पैशाची उधळण केल्यावर रिकामे झालेले खिसे भरण्यासाठी गैरमार्गाने कमाई केली जाते. मग, भ्रष्टाचार वाढणारच. कर्नाटकमधील बोम्मईंचे सरकार भ्रष्टाचाराने मलीन झालेले आहे. आमच्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून ही निवडणूक आम्ही जिंकू याची खात्री आहे.

भाजपचे नेते येडियुरप्पा काँग्रेससाठी अडचण निर्माण करतील का?

खरगे – काही जागांवर त्यांचा प्रभाव असू शकतो, अशा १५-२० मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी भाजप येडियुरप्पांचा वापर करेल. अन्य जागांवर गडबड होऊ नये, याची दक्षता भाजपला घ्यावी लागणार आहे. यावेळी भाजपचे येडियुरप्पांवर बारीक लक्ष आहे. त्यामुळे येडियुरप्पांची आम्हाला चिंता नाही.

निवडणूक जाहीर होण्याआधीच उमेदवार जाहीर करण्याची घाई का केली?

खरगे – पहिल्या यादीतील १२४ उमेदवारांपैकी निम्म्याहून अधिक विद्यमान आमदार आहेत. ते दुसऱ्यांदा जिंकून येऊ शकतील असा विश्वास वाटतो. उर्वरित उमेदवारांतील बहुतांश जणांना पुन्हा संधी दिलेली आहे. दुसऱ्या यादीतील उमेदवार जाहीर करताना मात्र बंडखोरी होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. पहिल्या यादीत देखील ज्यांना संधी मिळालेली नाही, त्यांना समजावण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवार निवडीमध्ये अडचण येणार नाही.

भाजपने ऐरणीवर आणलेला आरक्षणाचा मुद्दा काँग्रेससाठी त्रासदायक ठरेल का?

खरगे – मुस्लिमांचे ४ टक्के आरक्षण काढून घेऊन इतरांना (लिंगायत-वोक्कालिग) दिल्याची घोषणा करायची. अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणात वाढ केल्याचे जाहीर करायचे. पण, हे सगळे बदल घटनात्मक नाहीत. त्यामुळे ते प्रत्यक्षात आणण्याचा भाजपचा इरादाही नाही. त्यांना मते मिळवण्यासाठी केवळ देखावा उभा करायचा आहे. भाजप आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांची दिशाभूल करत असून आम्ही त्यांचा खोटेपणा उघडा करू.

काँग्रेसला कोणत्या बाबींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल?

खरगे – भाजप अनुसुचित जातींच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकतो. आम्ही अनुसूचित जातींतील एका समाजातील उमेदवार उभा केला तर, ते दुसऱ्या समाजातील उमेदवाराला रिंगणात उतरवतील. राखीव जागांवरील भाजपच्या धोरणाकडे अधिक द्यावे लागेल.

राहुल गांधींच्या मुद्द्यावरून विरोधकांमध्ये एकजूट झाल्याचे दिसते…

खरगे – राहुल गांधींना बडतर्फ करण्यासाठी विद्युतवेगाने हालचाली केल्या गेल्या. कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश आपल्या बाजूने निकाल देणार नाही अशी शंका आली म्हणून उच्च न्यायालयात खटल्याला स्थगिती मिळवली. न्यायाधीश बदलल्यावर लगेच स्थगिती उठवून राहुल गांधींना शिक्षा ठोठावली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदारकी रद्द केली. इतक्या जलद गतीने निर्णय प्रक्रिया पार पडल्याचे कधीही बघितले नव्हते. त्यातून भाजपचा उद्देश स्पष्ट होतो. लोकशाही टिकवायची असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन लढण्याशिवाय पर्याय नाही.

कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या मुद्द्याचा किती फायदा होईल?

खरगे – बोम्मई सरकारचा कारभार पाहून लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. कर्नाटकमधील भाजपविरोधात बोलण्यासाठी काँग्रेसकडे अनेक ठोस मुद्दे आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा हे दोघेही कर्नाटकमधील प्रचारात सक्रिय राहणार आहेत.

इतर राज्यांतील काँग्रेस संघटनेमध्ये वा नेतृत्वामध्ये बदल केला जाईल?

खरगे – आत्ता सगळे लक्ष कर्नाटकवर केंद्रीत केले आहे. त्यानंतर अन्य राज्यांचा विचार केला जाईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will win karnataka assembly election trust expressed by congress president mallikarjun kharge print politics news asj
First published on: 03-04-2023 at 11:13 IST