पालघर: वसई विभागात अधिराज्य गाजविणारे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत नेहमीच सत्ताधारी पक्षांबरोबर राहून परिसराचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. या वेळी वेगळी भूमिका घेत उमेदवार उभे करण्याचे ठाकूर यांनी जाहीर केले असून, मित्र पक्षांनीच आपल्याला मदत करावी अशी साद घातली आहे. यामुळे मित्र पक्ष ठाकूरांना मदत करतील का, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पालघर लोकसभा निवडणुकीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात असताना बहुजन विकास आघाडीतर्फे उमेदवार रिंगणात उतरवला जाईल असे त्यांनी जाहीर केले. आपले सर्व पक्षांमध्ये मित्र असून यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये व सरकारला मदत केल्याची आठवण सांगत आपल्या पक्षाला मित्रपक्षांनी पाठिंबा द्यावा अशी साद घातली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीने भारती कामडी यांच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर केली असताना हितेंद्र ठाकूर यांनी दिलेली साद महायुतीला असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा – “भारतात या, बघा आम्ही कसे जिंकतो?”; परदेशातील तब्बल २५ पक्षांच्या प्रतिनिधींना भाजपाने दिले निमंत्रण! दाखविणार ‘लोकशाहीचा सोहळा’

शिवसेनेतर्फे सन २०१९ मध्ये निवडून आलेले खासदार राजेंद्र गावित यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पालघरच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. तर पालघर लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक भाजपकडे असल्याचे सांगत भाजपाने उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये जागेसंदर्भात निश्चिती होत नसताना विद्यमान खासदार तसेच शिवसेना व भाजपा यांच्यातर्फे सुचवण्यात येणाऱ्या पर्यायी उमेदवारांबाबत विविध दावे- प्रतिदावे केले जात आहेत. या परिस्थितीचा लाभ घेत बहुजन विकास आघाडीने निवडणूक लढवण्याचे जाहीर करून मित्रपक्षाने आपल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावी अशी खेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा खेळली आहे.

२००९ मध्ये बहुजन विकास आघाडीच्या खासदारपदी बळीराम जाधव निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी केंद्रातील काँग्रेस प्रणित सरकारला पाठिंबा दिला होता. २०१४ च्या निवडणुकीसाठी तत्कालीन राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी मोठा गाजावाजा करून खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधून गावित यांची उमेदवारी मागे घ्यायला लावली व बहुजन विकास आघाडीतर्फे बळीराम जाधव यांना पुन्हा उमेदवारी रिंगणात उतरविले होते. मात्र मोदी लाटेमध्ये त्यांचा पराभव झाला होता.

सन २००२ मध्ये राज्यात विलासराव देशमुख यांचे सरकार अल्पमतात आले असताना सरकारला पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात त्यांनी सूर्या सिंचन प्रकल्पातून वसई तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून घेतली होती. मित्र पक्षांच्या मदतीने त्यांच्या प्रतिनिधीनी ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दोन प्रसंगी उपभोगले होते.

हेही वाचा – ‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!

सन २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात भाजपा व मित्र पक्षांची सत्ता आल्यानंतर त्यांचा कल सत्ताधाऱ्याकडे झुकल्याचे दिसून आले आहे. आपल्या भागाचा विकास साधण्यासाठी आपण असा निर्णय घेतल्याचे त्यांनी अनेकदा भूमिका मांडताना सांगितले आहे. तसेच सत्ताधाऱ्यांना दिलेल्या पाठिंब्याच्या बदल्यात वसई तालुक्यासाठी एमएमआरच्या माध्यमातून व इतर योजना मिळवल्या आहेत.

सन १९९० मध्ये काँग्रेसतर्फे आमदारपदी निवडून आलेले हितेंद्र ठाकूर हे नंतर वसई/बहुजन विकास आघाडी (अपक्ष) यांच्यातर्फे २००९ पर्यंत व नंतर २०१४ पासून आजतागायात सहा वेळा आमदार म्हणून कार्यरत आहेत. सद्यस्थितीत बहुजन विकास आघाडीचे त्यांच्यासह तीन आमदार असून राजकीय परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची खेळी यशस्वी होते का तसेच महायुती बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देते का याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे.