राजेश्वर ठाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वासार्हता आणि जनसमर्थन गमावलेल्या नेत्यांच्या हाती असलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीला लोकचळवळीचे रुप देण्याचे मोठे आव्हान या चळवळीत उडी घेणाऱ्या राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यापुढे असणार आहे. सध्या या चळवळीत जनतेचा सहभाग नाही. तो कसा वाढवता येईल यासाठीच प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचा विदर्भवाद्यांचा प्रयत्न असून त्याला किती यश येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास असलेली विदर्भ राज्याची चळवळ पूर्वी लोकचळवळ होती. मात्र, त्यानंतरच्या काळात या चळवळीचा फायदा घेत नेत्यांनी राजकीय लाभ पदरी पाडून घेतल्याने लोकांचा नेत्यांवरून विश्वास उडाला. त्याचा फटका स्वतंत्र विदर्भ चळवळीला बसला. त्यामुळे ही चळवळ आता केवळ नेत्यांची चळवळ उरली आहे. लोक सहभागाशिवाय कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही आणि राजकीय दबाव केंद्रावर निर्माण होऊ शकत नाही. हे लक्षात आल्यावर विदर्भवाद्यांनी लोकांना या चळवळीशी जोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून काँग्रेसचे नेते डॉ. आशीष देशमुख यांनी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना विदर्भात निमंत्रित केले आहे.

हेही वाचा… शिंदे-फडणवीस सरकारला कांदा रडवणार

यासंदर्भात डॉ. आशीष देशमुख म्हणाले, विविध राज्यात राजकीय पक्षांना सरकार स्थापन करण्यामध्ये प्रशांत किशोर यांनी मदत केली. तुम्ही नवीन राज्य निर्माण करण्यासाठी मदत करू शकाल का, हे विचारण्यासाठी मी प्रशांत किशोर यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी माझ्या प्रस्तावाला होकार दिला. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये वेगळ्या विदर्भासाठी माझ्यासह काम करणाऱ्या लोकांची एक टीमसुद्धा त्यांना भेटून आली आहे. त्यांनी त्यांचा अहवाल प्रशांत किशोर यांना दिला. त्यानंतर गेल्याच आठवड्यात झूम मिटींगच्या माध्यमातून त्यांनी आम्हा सर्वांना संबोधित केले. आता येत्या २८ सप्टेंबरला नागपुरात त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा… विधान परिषदेवरील १२ आमदारांची नियुक्ती कधी ?

विदर्भ स्वतंत्र राज्य व्हावे, ही येथील जनतेच्या मनातील इच्छा आहे. यापूर्वी कितीतरी माध्यमातून ही बाब पुढे आली आहे. विदर्भ स्वतंत्र राज्य होण्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. येथील नेत्यांमध्ये स्वतंत्र विदर्भाबाबत इच्छाशक्ती जागृत व्हावी, यासाठी रणनीति आखण्यात येणार आहे. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी यशस्वीपणे काम केलेले आहे. आता स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी ते आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, असेही ते म्हणाले.
तेलंगणाप्रमाणे केवळ स्वतंत्र राज्याच्या मुद्यावर कोणताही पक्ष निवडणुका जिंकू शकत नाही. परंतु याचा अर्थ विदर्भाच्या जनतेला वेगळे राज्य नको असे अजिबात नाही. हे प्रशांत किशोर यांच्या टीमने केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी विदर्भवाद्यांना स्वतंत्र राज्याची चळवळ नव्याने उभी करण्यासाठी सहकार्य करण्याचे कबूल केले आहे. त्याला कितपत यश येते हे काळच ठरवेल.

हेही वाचा… सांगलीत भाजपकडून सव्याज परतफेड

राजकीय पार्टी व भूमि

विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ शिखरावर होती. त्यात लोकसहभागही होता. त्यानंतर केवळ निवडणुकीपुरती विदर्भ राज्याची मागणी होत गेली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रमुख मुद्दा वेगळा विदर्भ हा होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी निवडून आल्यास स्वतंत्र विदर्भ करू असे प्रतिज्ञापत्र दिले . भाजपच्या भुवनेश्वर अधिवेशनात तसा ठराव देखील घेण्यात आला. पण केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यावर भाजपला त्याचा विसर पडला. काँग्रेसने देखील अनेकदा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा दिला. पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी ती मागणी रेटली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने तर जनतेची इच्छा असेल तर त्यावर विचार करू, असे नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेतली. शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे. या पक्षाचा विदर्भ राज्याला स्पष्ट विरोध आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विदर्भवादी नेत्यांनी चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will separate vidarbha movement will gain earlier days print politics news asj
First published on: 16-09-2022 at 13:22 IST