अजित पवारांकडून नेत्यांची कानउघडणी

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची निर्मिती शरद पवार यांचे नेतृत्व आणि स्वाभिमानातून झाली आहे. तालुक्यात पक्षाचे जीव तोडून काम करणारे कार्यकत्रे आहेत. परंतु एकमेकांच्या पाय ओढण्याच्या सवयीमुळे निवडणुकीत अपेक्षित यश मिळत नाही. पुरंदरमध्ये जिल्हा परिषद व पंचायतीच्या सर्व बारा जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून आपल्या पक्षाचा कोणी नेता पक्षाच्या विरोधात काम करायला गावात आला तर कार्यकर्त्यांनी त्याचे नाव मला त्वरित कळवावे. मी त्याचा बंदोबस्त करतो, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षविरोधात काम करणाऱ्यांना खडसावले.

शिवरी येथे त्रिमूर्ती मंगल कार्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. पक्षविरोधी काम करणाऱ्यांनी पुन्हा पवार साहेब, सुप्रियाताई किंवा माझ्या सभेत व्यासपीठावर येऊन बसायचे नाही. मी स्वत: त्याला खाली उतरवीन, असा सज्जड दमही पवार यांनी दिला. कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करुन त्यांच्या बोलण्याला दाद दिली. तालुक्यातील कार्यकत्रे या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार अशोक टेकवडे, पक्षाचे नेते विजय कोलते, सुदाम इंगळे, जगन्नाथ शेवाळे, प्रा.दिगंबर दुर्गाडे, माणिक झेंडे, बापू भोर, सारीका इंगळे, दत्ता चव्हाण, अंजना भोर यांची प्रमुख उपस्थिती होती.पक्षाला मोठे मताधिक्य देणारा हा तालुका आहे. सर्वानी एकजुटीने काम केल्याने दहा वर्षांपूर्वी अशोक टेकवडे आमदार झाले होते. मात्र आता एकमेकांच्या पाय ओढण्याच्या सवयीमुळे मार बसतोय. तुम्हाला साहेबांनी काय दिले नाही, विकासाला निधी दिला, विविध योजना दिल्या, तरीही सासवडला संपूर्ण शहरात घडय़ाळ चिन्ह घेऊन लढणारे उमेदवार मिळत नाहीत, हे आमच्या नेत्यांचे कर्तृत्व. राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी जेजुरी नगरपालिका निवडणुकीत आपल्याच पक्षातील लोकांनी दगाफटका केल्याने हातातून गेली. भाषणे करुन एकमेकांना दुखावण्यापेक्षा ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत का ते पाहा, असेही ते म्हणाले.