पुण्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गरज असल्यास पुन्हा जनता संचारबंदी लागू करा, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी प्रशासनाला केली. संचारबंदी करताना नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, याबाबत खबरदारी घ्या, असेही पवार यांनी सांगितले.

करोना सद्य:स्थितीबाबत आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी या सूचना दिल्या. विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के . वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कु मार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह इतर संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते.

जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी अन्य राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जनता संचारबंदी मोठय़ा प्रमाणात राबवण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर पवार म्हणाले, ‘गरज असल्यास पुण्यातही जनता संचारबंदी लागू करा. मात्र, हे करताना नागरिकांना त्रास आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही. याबाबत खबरदारी घेण्यात यावी.’

दरम्यान, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर उभारण्यात आलेल्या मोठय़ा करोना रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. तसेच प्राणवायू पुरवठय़ाअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत बैठकीमध्ये पवार यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत यापुढे अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसून थेट कारवाई करू, असा इशाराही दिला.

 ‘खाटा व्यवस्थापन’ करा

एका अधिकाऱ्याने मुंबई महापालिके ची खाटा व्यवस्थापनाची कार्यपद्धती कथन के ली. त्यावर पवार म्हणाले, ‘करोनाबाधित झाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयात भरती होण्यासाठी मुंबई महापालिके शी संपर्क केला होता. मुंबईत केंद्रीय पद्धतीने खाटा व्यवस्थापन होत असेल, तर पुण्यात का होत नाही?, पुण्यातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना खाटा मिळण्यासाठी केंद्रीय पद्धतीने खाटा व्यवस्थापन करा.

सादरीकरण पुरे ; चांगले परिणाम दिसू द्या

सीओईपी रुग्णालयातील गोंधळाची जबाबदारी एकमेकांवर न ढकलता विभागीय आयुक्त, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी एकत्रितपणे नियोजन करून परिस्थिती नियंत्रणात आणावी. किती वेळा तेच-तेच सांगायचे, आता खूप झाले. यापुढे तक्रारी आल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पवार यांनी देताच बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला. तसेच आता सादरीकरण पुरे; चांगले परिणाम दिसू द्या, अशी तंबीही उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना या वेळी दिली.