संजय जाधव, लोकसत्ता पुणे : घरगुती वाद अथवा शहराचे आकर्षण यामुळे अनेक मुले घर सोडून पळून जातात. ही मुले ही प्रामुख्याने रेल्वेगाड्यांत वा स्थानकांवर आश्रय घेतात. त्यांपैकी ७३३ मुलांची पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घडविण्याची कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाने मागील सहा महिन्यांत केली आहे. त्यात पुणे विभागाने १८८ मुलांची सुटका केली आहे. याचबरोबर रेल्वेत वस्तू विसरलेल्या प्रवाशांना सुमारे ३९ लाखांच्या वस्तू आरपीएफने सप्टेंबर महिन्यात परत मिळवून दिल्या आहेत. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेंतर्गत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेवरील स्थानकांतून लोहमार्ग पोलीस आणि इतर रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने ७३३ मुलांची सुटका केली आहे. त्यात ५१७ मुले आणि २१६ मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मुलांची पालकांशी पुन्हा भेट घडवण्यात आली आहे. आणखी वाचा-‘मेफेड्रोन’ विक्रीचे जाळे देशासह परदेशात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक २०६ मुलांची सुटका केली असून, त्यांत १३९ मुले आणि ६७ मुलींचा समावेश आहे. पुणे विभागाने १८८ मुलांची सुटका केली असून, यामध्ये १८१ मुले आणि ७ मुलींचा समावेश आहे. भुसावळ विभागाने २०५ मुलांची सुटका केली असून, त्यात १२८ मुले आणि ७७ मुलींचा समावेश आहे. नागपूर विभागाने सुटका केलेल्या ९५ मुलांमध्ये ४७ मुले आणि ४८ मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागाने ३९ मुलांची सुटका केली असून, त्यात २२ मुले आणि १७ मुलींचा समावेश आहे. अनेक प्रवासी गाडीत सामान अथवा मोबाइलसारख्या वस्तू विसरतात. आरपीएफचे कर्मचारी अशा वस्तू प्रवाशांना परत मिळवून देतात. आरपीएफने ‘अमानत’ मोहिमेंतर्गत सप्टेंबरमध्ये ३९ लाख ५१ हजार रुपयांचे सामान प्रवाशांना परत मिळवून दिले. याचबरोबर सप्टेंबरमध्ये आरपीएफच्या जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात तीन जणांचा जीव वाचवला. आणखी वाचा-पिंपरी-चिंचवड: करोडपती झालेल्या ‘त्या’ पीएसआय ची चौकशी होणार, चौकशीनंतर कारवाई अटळ…? २३ लाखांचे अमली पदार्थ जप्त अमली पदार्थांची तस्करी आणि रेल्वेतून होणारी बेकायदा दारू वाहतूक यावर आरपीएफकडून कारवाई सुरू आहे. आरपीएफने सप्टेंबरमध्ये २३ लाख ७५ हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. त्याचबरोबर ७५ हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. तसेच, तिघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ४८३ कासवे जप्त केली आहेत.