पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पुलाच्या कठड्यावर रिक्षा आदळून प्रवासी तरुणाचा मृत्यू झाला. रिक्षाचालकाने अल्पवयीनाच्या ताब्यात रिक्षा चालविण्यास दिल्याने अपघाताची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी रिक्षाचालकासह अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रितेश शिवाजी गायकवाड (वय १९, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्यमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षाचालक जालिंदर बबन साळुंके (वय ३५, रा. साईबाबा मंदिराजवळ, कात्रज) याच्यासह एका अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई विठ्ठल चिपाडे यांनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक साळुंके, अल्पवयीन, गायकवाड हे ओळखीचे आहेत. १५ एप्रिल रोजी रिक्षातून कात्रज-कोंढवा रस्त्यावरून निघाले होते. त्या वेळी रिक्षाचालक साळुंकेने अल्पवयीनाला रिक्षा चालविण्यास दिली होती. भरधाव रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा पुलाच्या कठड्यावर आदळली. अपघातात रिक्षातील तरुण रितेश गायकवाड गंभीर जखमी झाला. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस तपासात रिक्षाचालक साळुंकेने अल्पवयीनाला रिक्षा चालविण्यास दिल्याने अपघात घडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करत आहेत.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. महेश मनोहर चव्हाण (वय २८, रा. साजूर, कराड, जि. सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नीलेश सुर्वे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार चव्हाण हे बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नगर रस्त्याने निघाले होते. खराडी बाह्यवळण मार्ग चौकात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार चव्हाण यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ढावरे तपास करत आहेत.