पुणे : ‘मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना शिवराजसिंह चौहान यांनी राबविलेल्या ‘लाडली बहना’ योजनेमुळे आम्हाला प्रेरणा मिळाली. त्यातूनच आम्ही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली. त्याद्वारे महिलांचे मन आणि विश्वास जिंकल्याने तो विश्वास मतपेटीतून मोठ्या प्रमाणावर व्यक्त झाला. चौहान यांनीच हा मार्ग दाखविल्याने महायुती सत्तेमध्ये आली,’ अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयाचे श्रेय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मंगळवारी दिले.

‘पुणे आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथाॅन’च्या समारोपावेळी अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना चौहान यांनी ‘लाडली बहना’ योजना आणली. या योजनेमुळेच मतदारांची मने जिंकण्याचा मार्ग आम्हाला मिळाला. या योजनेच्या धर्तीवरच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात आली. त्यातून मतदारांचा विश्वास मिळाला. या विश्वासामुळे मतपेट्याही महायुतीच्या बाजूने भरभरून वाहिल्या. राज्यातील २८८ पैकी २३६ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. हा आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा आणि ऐतिहासिक विजय आहे. त्यातून राज्यात महायुतीचे बळकट सरकार स्थापन झाले आहे. त्याबाबत चौहान यांचा आभारी आहे.’

यासंदर्भात चौहान यांनीही भाष्य केले. ते म्हणाले, ‘ही योजना माझी नाही, तर महाराष्ट्र शासनाचीच आहे. याबाबत मी सरकारला धन्यवाद देतो. त्यांना गरीब बहिणींचे दु:ख समजले. अनेक महिलांना अवघ्या काही हजारांसाठी अडचणी येत होत्या. या योजनेमुळे त्यांना मदत झाली.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मध्य प्रदेशात ‘लाडकी लक्ष्मी’पासून ‘लाडक्या बहिणी’पर्यंतचा प्रवास हा महिला सशक्तीकरणाचा आहे. महाराष्ट्राने केलेल्या अनेक कामांचा अवलंब अन्य राज्यांकडून केला जात आहे. देशात कुठे चांगले काम होत असेल, तर महाराष्ट्राकडून त्याचा स्वीकार केला जातो,’ असेही चौहान यांनी नमूद केले.