आनंद सराफ
महाराष्ट्रातील अनेक गावांचा पूर्वेतिहास लक्षात घेता, पाणवठय़ाच्या आधारे, डोंगर कुशीत तयार झालेल्या, छोटय़ा वस्त्या आणि कालांतराने झालेला त्यांचा विस्तार अशीच सर्वसाधारण परिस्थिती लक्षात येते. पुण्यनगरीचा विचार करता, मुळा मुठेचा परिसर आणि डोंगर रांगांचे भवताल, हेच प्रकर्षांने जाणवते. लोकसंख्येच्या वाढत्या घनतेनुसार घरांच्या रचना, अधिकाधिक समावेशकतेला पूरक होत गेल्या. धायरी गावाचा विचार करता हीच बाब अधोरेखित होते.
पुणे शहराच्या वेशीवर असणारी पर्वती आता शहराचा मध्य बिंदू ठरली आहे. नैर्ॠत्येचा परिसर लक्षात घेता लोकवस्ती टप्प्याटप्प्याने सिंहगड पायथ्यापर्यंत पोहोचली आहे. याच वाटेवरचे विकसनशील स्थानक म्हणून धायरी गावाचा उल्लेख करता येईल. सर्वसाधारणपणे गेल्या पंधरा-वीस वर्षांत धायरी गावाचा विकास झाला. गोडावून, कलाकारांचे स्टुडिओ, बेकरी व्यावसायिक, वृद्धाश्रम, अपंगांच्या संस्था, हमरस्ता आणि उड्डाण पुलांच्या सान्निध्यात विकसित झालेले उद्योग व्यवसाय, नागरी वस्तीला अनुरूप पूरक सेवा, शिक्षण आणि मनोरंजन केंद्रे, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार आणि त्यांना मिळालेले नवे रूप अशी साधारणपणे धायरी परिसराची वैशिष्टय़े सांगता येतील.
सिंहगड रस्त्याने पुढे गेल्यास हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी परिसराच्या पुढे धायरी गावाचा रस्ता लागतो. वांजळे उड्डाण पुलाखालून डाव्या हाताचा रस्ता थेट धायरी गाव, गावठाण विभाग आणि उंचवटय़ावरील मंदिरांकडे जातो. जसे जसे मूळ गावठाणाकडे जातो, तसतशी शिल्लक जुनी घरे, मोडकळीस आलेले वाडे, वड, पिंपळाचे कोंडीत राहिलेले पार, नूतनीकरण झालेली छोटी-मोठी मंदिरे अशा सर्व पाऊलखुणा आपल्याला दिसतात. गावाच्या इतर भागात फिरताना भव्य गृहसंकुले, डोंगराच्या बाजूला हिरवीगार शेते आणि नव्या बांधकामांची लगबग असे विविधरंगी चित्र दिसते. धायरी गावाची हद्द विचारात घेता वडगाव खुर्द, नांदेड फाटा, किरकटवाडी, नांदोशी, आरवी, काळेवाडी, जांभूळवाडी, नऱ्हे अशा परिघात हे गाव सामावले आहे. सध्याची लोकवस्ती ही साठ हजाराचे आसपास असल्याचे समजले.
गावातील जुनी मंदिरे जाणून घेताना डोंगर भागात असलेले खंडोबाचे मंदिर, धारेश्वर, मारुती, पांडुरंग, दत्त, भैरोबा, लक्ष्मी आई, फोडी आई, वेताळबुवा, बापूजी बुवा, जैतोजीबुवा अशी श्रद्धास्थाने आहेत. खंडोबाचे मंदिर आणि परिसर हा एखाद्या हिल स्टेशनप्रमाणे भासतो. धारेश्वर मंदिर हे छोटय़ा टेकडीवजा विस्तीर्ण परिसरात सामावले आहे. दीपमाळ, तुळशी वृंदावन, भक्तांसाठी बैठकीची व्यवस्था, ऐसपैस पार, रुंद दगडी पायऱ्या असे सर्व काही भक्तांबरोबरच पर्यटकांनाही आकर्षित करते. नवजात बालकांना काही आजार झाल्यास वैद्यकीय उपचाराबरोबर आजही फोडी आईच्या मंदिरात दर्शनासाठी नेले जाते.
मंदिरांचे प्रासंगिक उत्सव आजही पारंपरिक पद्धतीनेच साजरे होतात. मानपान आणि प्रथा सांभाळण्याच्या परंपरा जपताना सर्व समाजाच्या सहभागातून आजही समरसतेचे दर्शन घडते. खंडोबाच्या मंदिरात पौष महिन्यात खोपरसट उत्सव होतो. या वेळी मिरवणुकीच्या अग्रभागी, हरिजन घराण्यातील भक्त, दोन्ही गालांमध्ये दाभण टोचून, तसेच उलटय़ा खिळ्यांच्या खडावा घालून मिरवणुकीत सहभागी होतो.
धारेश्वर मंदिराचा उत्सव, गुढीपाडवा पासून सुरू होतो. येथून शिखर शिंगणापूरला काठीची मिरवणूक (कावड) नेली जाते. सहाव्या दिवशी निघालेली मिरवणूक बाराव्या दिवशी परत येते. काळ बदलला तरी सजवलेल्या बैलगाडय़ा आजही सहभागी होतात. भंडारा प्रसाद म्हणून आंबील आणि घुगऱ्या करण्याचा रिवाज टिकून आहे. मिरवणुकीत पहाटे सादर केली जाणारी भलरी गीते आणि इतिहास कथन या रीती, नव्या पिढीनेही जपल्या आहेत. कुस्तीचे आखाडे, तमाशा, गाव प्रदक्षिणा यामध्ये आजतागायत बदल नाही.
धायरी गावाला शिवकालीन इतिहास आहे. मूळ गावकरी, जमीनदार, शेतकरी घराण्यामध्ये चव्हाण, रायकर, पोकळे (पवार), लायगुडे, बनकर, चाकणकर, भोसले या मंडळींचा समावेश होतो. हरिभाऊ पोकळे विद्यालय, बंडोजी खंडोजी विद्यालय इथे हजारो विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शिक्षणसेवा उपलब्ध आहेत. सुहृदय संचालित कर्णबधिर मुलांच्या शाळेत ५० जणांची निवास व्यवस्था आहे. मतिमंद मुलांसाठी ज्ञानगंगोत्री ही शाळा कार्यरत आहे. धारेश्वर विद्या क्रीडा प्रतिष्ठानच्या संकुलात बालवाडीपासून बारावीपर्यंतचे इंग्रजी, मराठी माध्यमातील शिक्षणाचा लाभ ५००० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रतिवर्षी घेतात. पुणे अंधजन संस्था संचालित, अंध महिला वृद्धाश्रम नांदेड फाटा येथे आहे. दिनकर थोपटे या नामवंत शिल्पकारांचा स्टुडिओ, लिज्जत उद्योग समूहाचे एक युनिट याच भागात आहे. पं. भीमसेनजी, व्यंकटेश माडगूळकर, महादेवशास्त्री जोशी आदींची निवासस्थाने या परिसराचे भूषण आहेत.
गावाच्या विकासासाठी झटलेल्या जुन्याजाणत्या मंडळींमध्ये अर्जुनराव चव्हाण, दामुअण्णा रायकर, पंढरीनाथ चव्हाण, बाळ पाटील, वसंतराव लायगुडे, हरिभाऊ पोकळे, अर्जुन रायकर यांची नावे समजली. नव्या पिढींपैकी रघुनाथ चव्हाण, राणोजी पोकळे, केशवराव रायकर, श्री. ल. चव्हाण, वस्ताद सुभाष पोकळे, काका चव्हाण, सोपान पोकळे, मदन भोसले यांचा उल्लेख आवश्यक आहे.
धायरीची ही माहिती संकलनासाठी बाजीराव रायकर, भीमराव चव्हाण, महेंद्र भोसले, किरण येनपुरे यांचे सहकार्य लाभले.