पिंपरी : बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील शंभर कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, उच्चदाब विद्युत वाहक तारांच्या एका मनोऱ्याच्या (टॉवर) अडथळ्यामुळे उर्वरित काम पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. मनोऱ्याच्या स्थलांतरासाठी बोपखेल येथील खासगी जागा ताब्यात येत नसल्याने पुलाचे काम रखडले आहे. परिणामी, बोपखेलवासीयांचा मागील नऊ वर्षांपासून सुरू असलेला १५ किलोमीटरचा वळसा अद्यापही सुरूच आहे.

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगने (सीएमई) १३ मे २०१५ रोजी बोपखेल ते दापोडी हा नागरी रस्ता बंद केला. नागरिकांना नाईलाजास्तव दिघी, विश्रांतवाडीमार्गे पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करावी लागत आहे. रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका नागरिकांसाठी बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर एक हजार ८६६ मीटर म्हणजे सुमारे दोन किलोमीटर अंतराचा पूल बांधण्यात येत आहे. पुलाचे काम टी ॲण्ड टी इन्फ्रा कंपनी करीत आहे. न्यायालयीन प्रक्रिया, संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात येण्यास विलंब या कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. बोपखेलच्या बाजूने काम पूर्ण झाल्यानंतर संरक्षण विभागाच्या खडकीकडील कामास दोन ऑक्टोबर २०२१ ला परवानगी मिळाल्यानंतर काम सुरू करण्यात आले.

हा पूल ५१२ आर्मी बेस वर्कशॉप, ॲम्युनिशन फॅक्टरी तसेच संरक्षण विभागाच्या इतर आस्थापनांच्या जवळून जात असल्याने सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूस पाच मीटर उंचीची सीमा भिंत उभारली आहे. त्यावर १.५ मीटर उंचीचे सुरक्षा कठडे बसविण्यात येत आहेत. पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. जागा ताब्यात घेणे, पुलाचे काम, मनोरे हटविणे, इतर कामांसाठी शंभर कोटींचा खर्च झाला आहे. नदी पात्र, लष्कराचा रेल्वे मार्ग, वन क्षेत्र, रस्ता व विविध संरक्षण विभागाच्या भूखंडावरून पूल जातो. रस्त्यांची रुंदी आठ मीटर असून दोन लेनचा मार्ग आहे. पुलावर पादचाऱ्यांसाठी पदपथ नाही. केवळ दुचाकी, तीन व चारचाकींसाठी वाहनांना पुलाचा वापर करता येणार आहे. पीएमपीएल बसची वाहतूकही येथून होणार नाही.

मनोरा स्थलांतरानंतरच काम

उच्चदाब वाहक विद्युत तारांच्या मनोऱ्याचे स्थलांतर केल्यानंतरच काम करता येणार आहे. त्यासाठी बोपखेलच्या बाजूने एक मनोरा उभारणे आवश्यक आहे. खडकीकडील जागा ताब्यात आली असून, तेथे पाच मनोरे उभारून तारांची जोडणी करण्यात आली आहे. मात्र, बोपखेल येथील खासगी जागा ताब्यात येत नसल्याने ते काम रखडले आहे. मनोरा स्थलांतर केल्याशिवाय पुलाचे काम करू नये, अशी सूचना महापारेषण कंपनीने महापालिकेला केली आहे. जागा ताब्यात घेण्याची कारवाई तत्काळ करण्याबाबत विद्युत विभागाकडून नगररचना विभागासोबत पत्रव्यवहार केला. मात्र, त्याला यश मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुलाचे अंतिम टप्प्यातील काम रखडले आहे. कामाची मुदत एप्रिल २०२३ संपून दहा महिने झाले तरी काम अर्धवट स्थितीत आहे.

स्थापत्य प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड म्हणाले की, मनोऱ्याचे स्थलांतर करण्यासाठी जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थलांतरण झाल्यानंतर तातडीने पूल तयार करून वाहतुकीसाठी खुला केला जाईल.

हेही वाचा : पुण्याच्या पूर्व भागाला गृहप्रकल्पांसाठी पसंती! जाणून घ्या कसा बदलतोय पुण्याचा नकाशा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी उपमहापौर, माजी स्थानिक नगरसेविका हिराबाई घुले म्हणाल्या की, बोपखेलवासीयांना नऊ वर्षांपासून १५ किलोमीटरचा वळसा मारावा लागत आहे. वेळ, पैसा वाया जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने जागा ताब्यात घेऊन पुलाचे काम पूर्ण करावे.