एखादा प्रदेशजिंकून घेतल्यानंतर त्याची ताबडतोब व्यवस्था लावली जात होती या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय धोरणांवर प्रकाश टाकणारे अस्सल पत्र उजेडात आले आहे. शिवचरित्रावर पीएच. डी. करणारे युवा अभ्यासक केदार फाळके यांना धुळे येथील सत्कायरेत्तेजक सभा आणि श्री समर्थ वागदेवता मंदिराच्या दफ्तरखान्यात हे पत्र मिळाले आहे.

डॉ. केदार फाळके हे सध्या रामचंद्र अमात्यलिखित आज्ञापत्रावर अभ्यास करीत आहेत. त्यासाठी धुळे येथील दफ्तरखान्यामध्ये त्यांना शिवाजी महाराजांनी पाठविलेले हे अस्सल पत्र मिळाले. या पत्रावरील अभ्यासासाठी त्यांना धुळे येथील डॉ. वि. आ. चितळे, शरद कुबेर, प्रा. डोंगरे आणि पुण्यातील रमण चितळे यांचे सहकार्य लाभले आहे.

शिवाजी महाराजांनी २३ जुलै १६७३ रोजी साताराजिंकून घेतला. त्यानंतर त्यांनी छ. १५ जमादिलावल आर्बा सबैन व अलफ या अरबी तारखेला म्हणजेच १८ ऑगस्ट १६७३ रोजी सातारा तर्फेचे सुभेदार अबाजी मोरदेव यांना पाठविले आहे. हे पत्र राज्याभिषेकापूर्वीचे असून त्याची सुरुवात ‘मशहुरल हजरत’ या मायन्याने झाली आहे. पाली येथील पाटीलकी वतनासंबंधात कान्होजी खराडे आणि काळभर यांच्यात वाद सुरू होता. काळभर यांची परंपरागत पाटीलकी वतन असतानाही खराडे हे त्यास अडथळा करीत होते. ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी सातारा तर्फेचे सुभेदार अबाजी मोरदेव यांना हे पत्र पाठविले. या पत्रात त्यांनी ‘कान्होजी खराडे यांना समज द्यावी. त्यांची घोडी किंवा माणसे पालीमध्ये असतील तर त्यांना बाहेर घालवून द्यावे आणि गावातील पिकांची लावणी, संचणीची कामे काळभरांकडूनच करून घ्यावीत’, असे आदेश दिले आहेत.

या पत्रावर दोन ओळींनंतर ‘श्री शिवनरपती हर्षनिदान महादेव मतिमत प्रधान’ हा प्रधानाचा शिक्का आहे. शेवटी ‘मर्यादेयं विराजते’ ही शिवरायांची मोर्तब मुद्रा आहे. पत्रातील हस्ताक्षर हे भारत इतिहास संशोधक मंडळात असलेल्या शिवाजी महाराजांनी १७ जुलै १६७३ रोजी दिलेल्या अस्सल कौलनाम्यातील हस्ताक्षरासारखेच आहे. या पत्राच्या शेवटची ‘परवानगी हुजूर’ ही अक्षरे मात्र अन्य व्यक्तीच्या हातची आहेत. पत्राच्या मागील बाजूस ‘सुरू सुद’ असा पत्रनोंदणीचा तत्कालीन शेरा असून त्याखाली पैवस्तीची म्हणजेच पत्र पोहोचल्याची तारीख छ. ६ जमादिलाखर अशी अरबी कालगणनेत दिली असून ती ८ सप्टेंबर १६७३ या इंग्रजी तारखेशी जुळते, अशी माहिती डॉ. केदार फाळके यांनी दिली.

शिवरायांच्या आजवर मिळालेल्या २७० पत्रांपेक्षा हे पत्र पूर्णपणे वेगळे आणि अप्रकाशित असेच आहे. या पत्रातील अक्षरांचे वळण, भाषाशैली, वाक्यरचना, शब्द हे शिवाजी महाराजांच्या अन्य पत्रांप्रमाणेच असून ‘साहेब बरे जाणताती’ ही वाक्यरचना याही पत्रात आढळून येते. कान्होजी खराडे आणि काळभर यांच्या वादातील न्यायाची बाजू कोणती हे शिवाजी महाराजांना माहीत होते. या वादाचा निकाल १ फेब्रुवारी १६७६ रोजी पाली येथे शिवाजी महाराजांच्या उपस्थिीतच महजर झाला. त्यामध्ये खराडे यांनी रवादिव्य केले. त्यात ते खोटे ठरले आणि पाटीलकी काळभरांचीच आहे, असे सिद्ध झाले, असेही फाळके यांनी सांगितले.