‘डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या काळात महाराष्ट्र साहित्य परिषद अनेक प्रकारे समृद्ध झाली. परिषदेच्या ऋणानुबंधातूनच माझी वाङ्मयीन जडणघडण झाली,’ अशी भावना लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार बुधवारी ढेरे यांना प्रदान करण्यात आला. परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह डॉ. कल्याणी दिवेकर, जोगळेकर यांचे पुत्र पराग जोगळेकर, कन्या उज्ज्वला जोगळेकर आदींनी ढेरे यांच्या घरी जाऊन त्यांचा गौरव केला.
ढेरे म्हणाले, ‘‘मी दिवसा नोकरी करून रात्रशाळेत शिक्षण घेत असे. त्यामुळे मला पुढील शिक्षण घेता आले नाही. परंतु कला शाखेतील पदवीशी समकक्ष असलेली महाराष्ट्र साहित्य परिषदेची ‘साहित्य विशारद’ ही परीक्षा मी उत्तीर्ण झालो. माझा आणि परिषदेचा ऋणानुबंध १९५० पासूनचा आहे. गं. ना . जोगळेकर यांच्या कालखंडात परिषद समृद्ध झाली. तो काळ आनंदाचा, उत्साहाचा आणि उत्तेजन देण्याचा होता.’’