पुणे : ‘संरक्षण आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पूर्वी आयात केलेले तंत्रज्ञान आता देशातच विकसित केले आहे आणि भविष्यातील जागतिक पातळीवर चर्चेत असलेल्या उत्पादनांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. आज भारत केवळ स्वतःच्याच गरजा पूर्ण करत नाही, तर जगाचा विश्वसनीय संरक्षण भागीदार होत आहे,’ असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडले. ‘उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे सेनादलांच्या आधुनिकीकरणासह तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत,’ असे सिंह यांनी नमूद केले.

राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीने पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्थेला (एआरडीई) भेट दिली. ही संस्था ‘आर्मामेंट अँड कॉम्बॅट इंजिनीअरिंग सिस्टीम्स’ (एसीई) या समूहांतर्गत कार्यरत आहे. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. समीर कामत या वेळी उपस्थित होते.

भेटीदरम्यान झालेल्या बैठकीत उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि संरक्षण संशोधन विकास संस्था याबाबत बोलताना सिंह यांनी संरक्षण क्षेत्राचे बदलते स्वरूप, बदलत्या युद्धाचा विचार करून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली. सिंह म्हणाले, ‘आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात विज्ञान आणि नवोन्मेषाला प्राधान्य देणारा देशच भविष्यात नेतृत्व करणार आहे.

तंत्रज्ञान केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित न राहता ते धोरणात्मक निर्णयांचे, संरक्षण व्यवस्थेचे आणि भविष्यातील धोरणांचे मूलभूत अधिष्ठान बनले आहे. आपले ध्येय केवळ संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेपुरते मर्यादित नाही, तर पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारी संस्कृती घडवून भारताला जागतिक संरक्षण नवोन्मेष केंद्र म्हणून स्थापित करण्याचे आहे. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता ही केवळ ध्येय नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेची सर्वांत मजबूत ढाल आहे.’

तंत्रज्ञानाचे निर्माते होण्याची गरज

‘राष्ट्रीय हित जपण्यासाठी आपण इतर देशांच्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहू शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक देश बचावात्मक धोरण स्वीकारून माहितीच्या आदानप्रदानास टाळाटाळ करतात. मात्र, भारताने या मर्यादांना आव्हान दिले आहे. आपण तंत्रज्ञानाचे वापरकर्तेच नाही, तर निर्मातेही व्हायला हवे. हे साध्य करण्यासाठी आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांना गती द्यावी लागेल,’ असे राजनाथ सिंह म्हणाले.

विविध उत्पादनांची पाहणी

समितीने भेटीदरम्यान विविध प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक संरक्षण उत्पादनांची पाहणी केली. त्यामध्ये ‘ॲडव्हान्स्ड टोड् आर्टिलरी गन सिस्टीम’, ‘पिनाका रॉकेट सिस्टीम’, ‘झोरावर’ हा रणगाडा, ‘आकाश-न्यू जनरेशन मिसाईल’ यांचा समावेश होता. समितीला रोबोटिक्स, रेल गन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टीम, हाय एनर्जी प्रोपल्शन मटेरिअल्स अशा तंत्रज्ञान विकासाविषयी माहिती देऊन संशोधन समूहाचा भविष्यातील विकास आराखडाही सादर करण्यात आला.