इंदापूर : मोसमी पावसाच्या आगमनाचे यंदा लवकरच संकेत मिळाल्याने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाहुणचार उरकून फ्लेमिंगो पक्षी मायदेशी स्थलांतरित होऊ लागले आहेत. विणीच्या हंगामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून इंदापुरातील तहसील कार्यालयाच्या आवारातील चिंचेच्या झाडांवर वास्तव्यासाठी आलेल्या चित्रबलाक पक्ष्यांनीही मायदेशी जाण्यासाठी आता आवराआवर सुरू केली आहे.
यंदा मोसमी पावसाच्या आगमनाचे संकेत लवकर मिळाल्याने शेकडो पक्षी आपल्या पिलांसह प्रयाण करण्याच्या तयारीत आहेत. उजनी धरणाचे सौंदर्य खुलवणाऱ्या रोहित पक्ष्यांनी मुक्कामाचा गाशा गुंडाळला असून, ते मायदेशी रवाना झाले आहेत. अन्य स्थलांतरित पक्ष्यांनीही मायदेशी परतण्यासाठी आवराआवर सुरू केली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवारातील चिंचेच्या झाडांना चित्रबलाक पक्ष्यांची पहिली पसंती असते. तालुक्यातील भादलवाडी परिसरात ब्रिटिशकालीन तलावातील झाडांवरही गेल्या १०-१२ वर्षांपूर्वी चित्रबलाक पक्ष्यांनी मोठ्या संख्येने वसाहत केली होती. मात्र, वेळोवेळी पडलेल्या अवर्षणामुळे पाण्याची उपलब्धता कमी असल्याने भादलवाडी तलावाकडे त्यांनी पाठ फिरविली आहे.
दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात थंडी वाढली, की या पक्ष्यांचे आगमन उजनी जलाशयाच्या पाणवठ्यानजीक होते. येथेच त्यांचा विणीचा हंगाम पार पडतो. मग सहा महिने या पक्ष्यांच्या गजबजाटाने उजनीचा परिसर खुलून जातो. त्यांच्या विणीच्या हंगामासाठी वसवलेल्या या वसाहतीला ‘सारंगार’ म्हणतात. सलग सहा महिने या सारंगाराला अनेक पक्षिमित्र, निसर्गमित्र भेट देत असतात.
नैऋत्य मोसमी पाऊस भारतात वेळेवर येणार असेल, तर या पक्ष्यांचे प्रयाण मेअखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होते. त्यामध्ये रोहित पक्ष्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ चित्रबलाक पक्षीही उजनीचा पाहुणचार संपवून आपल्या पिलांसह प्रयाण करतात. तत्पूर्वी विकलांग आणि उड्डाणक्षम नसलेल्या पिलांना उजनीच्या विस्तीर्ण पाणवठ्यावर सोडले जाते. त्यानंतर ते पक्षी उजनी जलाशयावर सहा महिने एकाकी अवस्थेत पुढच्या वर्षी येणाऱ्या सग्यासोयऱ्यांची वाट पाहतात. अशा वेळी असलेल्या अनेक जाती-प्रजातींच्या पक्ष्यांशी मिळतेजुळते घेत त्यांचे असणारे हे वास्तव्य पक्षिनिरीक्षकांसाठी कुतूहलाचे ठरते.- प्रा. खुशाल साळुंके, पक्षी अभ्यासक
दर वर्षी उजनीच्या जलाशयावर हजारोंच्या संख्येने विविध जाती-प्रजातींचे पक्षी अनेक देशांमधून वास्तव्यास येत असतात. ते पुन्हा मायदेशी परततात. मात्र, सध्या अनेक पक्ष्यांचे वास्तव्य वर्षभर होऊ लागले आहे. देश-परदेशातील पक्ष्यांच्या या मांदियाळीत स्थानिक कावळा, चिमण्यांची संख्या कमालीची घटली आहे. उजनी जलाशयावरील भिगवण ते कांदलगाव या चाळीस किलोमीटर अंतरामध्ये मोजकेच कावळे राहिले आहेत.- प्रा. सागर काळे,वनस्पती व पर्यावरण अभ्यासक